हत्यारे घेऊन चिनी सैनिकांचा जवानांना घेरण्याचा प्रयत्न

 

नवी दिल्ली । धारधार हत्यारे हातात घेऊन 50 चिनी सैनिकांनी भारतीय चौकीला घेरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र, धाडसी जवानांनी चीनचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे.

सोमवारी सायंकाळी भारतीय जवानांनी अडविल्यावर चिनी सैनिकांनी हवेत गोळीबार केला होता. यानंतर आज पुन्हा त्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. लडाखमध्ये आज पुन्हा गलवानसारखा खूनी हल्ला करण्याचा मनसुबा चिनी सैन्याचा होता. रेजांग लाच्या उत्तरेकडील मुखपुरीमध्ये 40 ते 50 चिनी सैनिकांनी भारताच्या चौकीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या हातामध्ये धारधार सुरे, चॉपर आदी लावलेले भाले होते. भारतीय जवानांनी हवेत गोळ्या झाडत त्यांना तेथून हुसकाऊन लावले.

भारतीय जवानांना घेरून चीनच्या सैनिकांनी खिळे लावलेल्या काटेरी रॉडने हल्ला केला होता. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर भारतीय जवानांच्या प्रत्यूत्तरात चीनचे सैनिक मोठ्या संख्येने मारले गेले होते.

आज भारतीय जवानांनी चीनच्या सैनिकांना हुसकावण्यासाठी गोळीबार केला. हे सैनिक केवळ 200 मीटर अंतरावर उभे होते. दुपारी चीन आणि भारताचे जवान आमनेसामने आल्याचे वृत्त आले होते.

Protected Content