अज्ञातांकडून झाड पेटवून पाडण्याचा प्रयत्न; वनरक्षकांच्या सतर्कतेने टळली मोठी दुर्घटना

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल-फैजपूर राज्य महामार्गावर अज्ञात व्यक्तींकडून झाड जाळून पाडण्याचा धक्कादायक प्रयत्न उघडकीस आला आहे. मात्र, वन विभागाचे कर्तव्यदक्ष आगार वनरक्षक बी. बी. गायकवाड यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल ते फैजपूर मार्गावर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासमोर एका मोठ्या आणि घनदाट झाडाला कोणीतरी अज्ञात व्यक्ती पेटवून पाडण्याचा प्रयत्न करत होते. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील काही भुरटे लाकूड व्यापारी आणि पर्यावरण शत्रू वारंवार जिवंत झाडे जाळून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

झाडाला आग लागल्याची माहिती मिळताच यावल वनविभागात कार्यरत असलेले आगार वनरक्षक बी. बी. गायकवाड यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाहिले की, आगीमुळे झाड पूर्णपणे जळाले असून ते काही क्षणात रस्त्यावर कोसळणार आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गायकवाड यांनी तातडीने मार्गावरील वाहनांची वाहतूक थांबवली. त्यांच्या या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. जर वेळेत वाहतूक थांबवली नसती, तर जळलेले आणि कोसळलेले झाड रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर पडले असते आणि त्यामुळे मोठी जीवितहानी झाली असती.

दरम्यान, काही वेळातच जळलेले झाड रस्त्यावर पडले. त्यानंतर गायकवाड यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवली आणि पडलेले झाड बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरळीत केली. आगार वनरक्षक बी. बी. गायकवाड यांनी दाखवलेल्या या समयसूचकतेमुळे आणि कर्तव्यदक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळली. जर ते वेळेवर घटनास्थळी पोहोचले नसते, तर नक्कीच एखादी अप्रिय घटना घडली असती, असे मत घटनास्थळी उपस्थित वाहनचालक आणि नागरिकांनी व्यक्त केले. त्यांनी गायकवाड यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. वन विभागाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन दोषी व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Protected Content