कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घेतली विहिरीत उडी !

रावेर लाईव्ह न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील एका शेतकऱ्याने सततच्या नापिकीला आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

विलास युवराज चोघरी (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विलास चोघरी हे दररोजप्रमाणे शेतात गेले होते, मात्र सायंकाळी घरी परतले नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेतला असता, त्यांच्या स्वतःच्या गट नंबर ७९ मधील शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. नातेवाईकांच्या सांगण्यानुसार, सततची नापिकी आणि युनियन बँकेकडून घेतलेले दोन लाख रुपयांचे कर्ज या आर्थिक अडचणींमुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. निळकंठ चौधरी यांच्या तक्रारीवरून रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Protected Content