श्रीक्षेत्र कपिलेश्‍वरवर उसळला भाविकांचा जनसागर

अमळनेर- गजानन पाटील | असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र कपिलेश्‍वर येथे आज पहाटेपासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली असून यानिमित्त यात्रोत्सव देखील सुरू झाला आहे.

अमळनेर तालुक्याच्या पश्चिमेला व शहरापासून २५ किमी अंतर असलेल्या खान्देशातील पर्यटन व तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेले तालुक्यातील,नीम जवळील कपिलेश्वर महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे. आज ता.१ मार्च अर्थात, महाशिवरात्री यात्रोत्सवास सुरुवात झाली असून पंधरा दिवस हा यात्रोत्सव सुरू राहणार आहे.

जळगाव व धुळे जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेले एकहजार वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेले श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर हे खान्देशातच नव्हे तर भारतात अल्पवाधित सर्वत्र परिचयास आलेले ह्या मंदिरावर राज्यातील काना कोपर्‍यातुन भाविकांची गर्दी होऊ लागल्याने परिसराला महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला तापी , पांझरा आणि गुप्तगंगा असलेल्या त्रिवेणी संगमावर सुमारे एक हजार वर्षांपूर्वी ऋषी कपिल मुनींनी तपस्या करीत शिवलिंगाची स्थापना केली आहे. या मंदिराचे महत्व स्कंदपुराणातही सांगितले गेले असून याच ठिकाणी मंदिराचे मठाधिपती हंसांनंदजी महाराज यांनी सन २००५ साली अखिल भारतीय संत संमेलन भरविले होते. यावेळी भारतातुन संतांनी हजेरी लावीत कळमसरेसह परिसरातील भूमी पावन झाली आहे.अध्यत्म आणि सामाजिकता यातून परिसरात कायापालट झाला असून मंदिराला लागूनच अनिरुद्ध बापूंचा आश्रम आहे.

या ठिकाणी दर शनिवारी व रविवारी मुंबई,पुणे ,नाशिकसह महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातुन भाविक येत असल्याने या निसर्गाच्या सानिध्यात भाविकांची मांदियाळी नजरेस पडत आहे. याच ठिकाणी मठाधिपती हंसांनंद महाराज यांनी लहान बालकांसाठी वेधशाळा सुरू केली असून शालेय शिक्षणाबरोबर त्यांना अध्यात्म न्यान दिले जात आहे.मंदिरावर वर्षभर धार्मिक, सामाजिक कार्यक्रम सुरू असतात.तर महाशिवरात्रीला मोठा यात्रोत्सव भरविला जातो.

मंदिरात तीन शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे.या जागृत देवस्थानच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक येत असतात. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचे बांधकाम केले आहे.दरम्यान यात्रोत्सवासाठी पाळणा,उपहारगृहे,संसार उपयोगी वस्तू, खेळण्याची दुकाने थाटली असून मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक जयेश खलाने , त्यांचे पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त राहणार असून मंदिरावर दाळ बट्टीचा नैवदय ,नवस फेडण्यासाठी भाविक दाखल झाले आहेत.

पर्यटन स्थळाचा नुसताच गाजावाजा

श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिराला तीर्थस्थळ व पर्यटनस्थळचा दर्जा मिळाला असल्याचा गाजावाजा आजही केला जातो खरा मात्र,मंदिराची जागा आजतागायत नावे नसल्याने शासनाच्या मिळणार्‍या निधी पासून या तीर्थक्षेत्रास वंचित राहावे लागत आहे.परिणामी हंसानद महाराज व मंदिराचे विश्वस्त जळगाव धुळे जिल्ह्यात झोळी फिरवित बरीच विकासकामे केली आहेत. तर सद्यस्थितित लोकवर्गणीतुन भक्त निवासाचे काम सुरु आहे. खान्देशातील प्रसिद्ध असलेले या मंदिराची महती सर्वदूर असल्याने दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे.सुलवाडे बॅरेजच्या बॅक वॉटर मुळे मंदिराच्या तापी व पांझरा नदित दोन्ही बाजूस पाणी असल्यामुळे यात्रोत्सव दोन्ही काठांवर भरविला जातो. खेळण्याची दुकाने,उपहार गृहे ,संसार उपयोगी वस्तु आदी दुकाने थाटली आहे. महाशिवरात्री निमित्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन हंसानद महाराज व मंदिराचे विश्वस्त यांनी केले आहे.

Protected Content