सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना लसीचे दोन डोस पूर्ण करावे लागणार !

मुंबई प्रतिनिधी | शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा सावध पवित्रा असतांना आता सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना लसींचे दोन डोस पूर्ण करावे लागणार असल्याची माहिती आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

राज्यात शाळ कधी सुरू होणार याबाबत अद्यापही ठोस माहिती समोर आलेली नाही. या पार्श्‍वभूमिवर, आज उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत, अशा सूचना देण्यात आल्या असून तसा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री  पवार यांनी आज दिली. दरम्यान, आपला पाल्य ज्या शाळेत जातोय त्या शिक्षकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यास पालकांना दिलासा मिळेल असेही अजित पवार म्हणाले. 

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत, असेही ते म्हणाले. मात्र केंद्राकडून गर्दी करणारे उत्सव घरगुती पद्धतीने साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या मात्र काही दिवसातच विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले होते. शिवाय तिसर्या लाटेत सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आणि दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने राज्याला काही सूचना केल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

Protected Content