मलकापूर (वृत्तसंस्था) येथून जवळच राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर आज दुपारी झालेल्या एका भीषण अपघातामध्ये महिंद्रा मॅक्झीमो वाहनातील १३ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. यातील भारंबे दाम्पत्य हे भुसावळातील रहिवासी आहे.
महामार्गावर एका कारखान्यासमोर ट्रक आणि महिंद्रा मॅक्झीमो यांच्यात धडक होवून हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील १३ जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला, तीन मुले आणि आठ पुरुषांचा समावेश आहे. या गाडीत एकूण १६ प्रवासी होते, त्यातील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या अपघातातील मृतांमध्ये भुसावळातील जामनेर रोडवरील अॅक्सिस बँकेच्या मागील रहिवासी प्रकाश किसन भारंबे (वय ५७) आणि त्यांच्या पत्नी मेघा प्रकाश भारंबे (वय ५३) यांचाही समावेश आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूची वार्ता येताच परिसरावर शोककळा पसरली आहे.महामार्गावर या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिकांनी लागलीच अपघाताची माहिती पोलिसांना कळवल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रस्त्यामध्ये असलेले अपघातग्रस्त वाहनही त्वरित बाजुला हटवून पोलिसांनी वाहतूक कोंडी दूर केली आहे.