भुसावळात दोन गटांत तुफान गोंधळ; दगडफेक, शिवीगाळ आणि खोटे फायरींग दाखवण्याचा प्रयत्न

भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ शहरातील वाल्मीक नगर येथे दोन गटांमध्ये रात्री उशिरा मोठा गोंधळ झाला. यावेळी पोलिसांची तुकडी घटनास्थळी उपस्थित असतानाही जमावाने आक्रमक होत दगडफेक, शिवीगाळ, मारहाण केली. विशेष म्हणजे या गोंधळादरम्यान एका गटाने खोटे पुरावे निर्माण करून फायरींग झाल्याचा देखावा करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी 7.65 मिमी कॅलिबरची रिकामी पितळी पुंगळी आढळून आली. आरोपी निखिल धामणे याने आकाश पंडीत याने फायरींग केल्याचा दावा केला होता. मात्र साक्षीदारांच्या जबाबात व घटनास्थळी कोणतेही प्रत्यक्ष फायरींग झाल्याचे पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे निखिल धामणे याने खोटा आरोप करत खोटा पुरावा तयार केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी नोंदवला आहे.

या प्रकरणात निखिल धामणे, गोपी धामणे, जय उर्फ कालू जाधव आणि आकाश पंडीत या चौघांना अटक करण्यात आली असून एकूण 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय आणखी 10-12 अनोळखी व्यक्तींचाही या प्रकरणात समावेश आहे.

या सर्वांवर भारतीय न्यायसंहिता 2023 मधील विविध गंभीर कलमे आणि मुंबई पोलीस अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रकरणाच्या गांभीर्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Protected Content