जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात शेतीला शाश्वत सिंचनाचा आधार मिळावा आणि तालुक्यातील प्रत्येक इंच जमीन पाणीदार होण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने गोंडखेड येथे भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. या वेळी त्यांनी तालुक्यात राज्य आणि देशात नवा आदर्श निर्माण करणाऱ्या जलसंधारण प्रकल्पाची घोषणा केली.
मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मुबलक पाणी मिळावे, शेती बहरावी आणि उत्पादन दुप्पट व्हावे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. शेततळे हा शाश्वत सिंचनाचा उत्तम पर्याय असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवता येईल.” या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यातील २८ गावांमध्ये २०२० शेततळ्यांची निर्मिती करण्याचे नियोजन आहे. यासाठी राज्य शासनाचा निधी उपलब्ध होणार आहे. गोंडखेड येथे पार पडलेल्या या भव्य मेळाव्यात हजारो शेतकरी व लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. गोंडखेड शिवारातील शेतकरी मेळाव्यात सुक्ष्मसिंचन शेतीसोबतच जोडधंदे म्हणून पशुपालन, मस्यपालन, फळशेती तसेच शेततळे परिसरात सोलर पॅनलद्वारे वीज निर्मिती याबाबतही माहिती देण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाच्या संधी मिळणार आहेत.
“माझे स्वप्न आहे की, जामनेर तालुका केवळ सिंचनच नाही, तर सर्वच क्षेत्रांमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर जावा,” असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. या महत्त्वाकांक्षी जलसंधारण योजनेमुळे भविष्यात जामनेर तालुका कृषी क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या ऐतिहासिक कार्यक्रमास आमदार मंगेश चव्हाण, स्थानिक लोकप्रतिनिधी, तापी पाटबंधारे विभाग महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. पी.के. पवार, मुख्य अभियंता जे.डी. बोटकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल, जलसंपदा आणि महसूल विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. लाभार्थी शेतकऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. जामनेर तालुक्यात जलक्रांती घडविणाऱ्या या अभिनव प्रकल्पामुळे येत्या काही वर्षांत शेतीला भरघोस फायदा होईल आणि तालुका सुजलाम-सुफलाम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.