धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरूणाचा जागीच मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । मुंबईहून हवाडाकडे जाणाऱ्या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या तरूणाचा पाय घसरल्याने खाली पडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील म्हसावद जवळ घडली. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

 

सविस्तर माहिती अशी की, अबजूर शेख जियाऊल हक (वय-२३) रा. रहिमपूर, माणिकचक, इनायतपूर जि. मालदा (पश्चि बंगाल) हा तरूण आज सकाळी त्याचा भाचा मसीद ऊर रहेमान यांच्यासोबत रमजाननिमित्त मुंबईहून पश्चिम बंगाल येथे गावी जाण्यासाठी आज सकाळी ८ वाजता मुंबईहून बसले होते. दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या दरम्यान मुंबई-हावडा मेल पाचोराकडून जळगावकडे जात असतांना अबजूर शेख हा पाणीपिण्यासाठी जात असतांना रेल्वे बोगीच्या दरवाजाजवळ पाय घसरल्याने खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला. हा अपघात रेल्वे खंबा क्रमांक ४००/ १३-१५ जवळ घडला. म्हसावद रेल्वे स्टेशन मास्तर श्री राजपूत यांनी जळगाव रेल्वे पोलीसांना माहिती दिली. पोहेकॉ अनिंद्र नगराळे यांनी घटनास्थळ धाव घेतली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह भाचा मसीद ऊर रेहमान यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिंद्र नगराळे करीत आहे.

Protected Content