जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा-उन्मेष पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी | जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाता-ताेंडाशी अालेला घास निसर्गाने हिरावून नेला अाहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाभरात गेल्या पंधरवड्यात अर्थात १८ तारखेपासून सातत्याने अतिवृष्टी होत असल्याने शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. मूग, उडिद, मका, बाजरी, कापूस या पिकांचे अतिवृष्टीमुळे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कापणीला आलेले पीक अवेळी पडलेल्या पावसामुळे वाया गेले आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील उभी पीके पाण्याखाली गेल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतात गुडघाभर पाणी साचल्याने कापूस लाल पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखाे रुपयांचे नुकसान हाेवून बळीराजा हवालदिल झाले आहेत.

यात पुढे म्हटले आहे कि दरम्यान, शासनाने नुकसानींचे पंचनामे करण्याचे आदेश देवून ही प्रत्यक्ष बांधावर जावून अद्यापही पंचनामे केले जात नसल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत आहे. ५० टक्क्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झालेले असल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी खासदार उन्मेष पाटील पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याच विषयावर खासदार उन्मेष पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना साकडे घातले अाहे. शेतकऱ्यांना अशा कठिण काळात अधिकाधिक मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

अतिवृष्टीमुळे पिकांचे, घरांचे व रस्त्यांसह सर्वच पातळीवरील नुकसान पाहता जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी खासदार पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Protected Content