भारताची ३८ हजार चौरस किलोमीटर जमीन चीनने बळकावली

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत महत्त्वाची माहिती दिली. लडाखमधील भारताची ३८ हजार चौरस किलोमीटर जमीन अनधिकृतपणे चीनने बळकावली आहे. त्याशिवाय १९६३ साली तथाकथित सीमा करारांतर्गत पाकिस्तानने पाकव्याप्त मधील ५,१८० चौरस किलोमीटरचा भूभाग बेकायदरित्या चीनकडे सोपवला अशी माहिती राजनाथ सिंह यांनी आज संसदेत दिली.

सीमा प्रश्न एक जटिल मुद्दा आहे हे भारत आणि चीन दोघांनी औपचारिकरित्या मान्य केले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी संयमाची आवश्यकता आहे तसेच शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातूनच या मुद्याचे निष्पक्ष, परस्पर सहमतीने समाधान निघू शकते असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ दोन्ही देश सैन्याची तैनाती कमी ठेवतील असा १९९३ आणि १९९६ मध्ये झालेल्या करारात उल्लेख आहे. सीमा प्रश्नी जो पर्यंत तोडगा निघत नाही, तो पर्यंत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा आदर ठेवायचा, उल्लंघन करायचे नाही असे सुद्धा करारात म्हटले आहे असे राजनाथ सिंह यांनी सांगितले

Protected Content