…ही तर वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखी ! – आदित्य ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्ये प्रकरणी सुरू असलेले राजकारण हे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखी असल्याचे सांगत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी मौन सोडले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मंत्री आदित्य ठाकरेंचे नाव गोवण्याचं विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याबाबत थेट त्यांच्यावर आरोप केले आहेत. या आरोपांना शिवसेनेच्या नेत्यांनी उत्तर दिले असले तरी खुद्द आदित्य ठाकरे यांनी चुप्पी साधली होती. या पार्श्‍वभूमिवर आज त्यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

या पत्रकात आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी म्हटले आहे की, सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे, ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत हा काही गुन्हा नाही.

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू तितकाच धक्कादायक आहे, मुंबई पोलीस खोलवर तपास करत आहे. पण ज्यांचा कायद्यावर विश्‍वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नातू म्हणून सांगतो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असं कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही, फालतू आरोप करणार्‍यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच घ्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील, या प्रश्‍नी मी आजही संयमानेच वागत आहे, अशाप्रकारे चिखलफेक करुन सरकार आणि ठाकरे कुटुंबाची बदनामी करता येईल या भ्रमात कोणी राहू नये तूर्त इतकेच ! अशा शब्दात शिवसेना मंत्री आदित्य ठाकरेंनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Protected Content