पंढरपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी आणि भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 23 आणि 24 जून रोजी सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. विठ्ठलाच्या मूर्तीची वाढती झीज रोखण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (ASI) यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती संवर्धन आणि संरक्षक लेपनाची प्रक्रिया करण्यात येणार आहे.
मंदिर प्रशासनाने देशभरातील वारकरी, भाविक आणि पर्यटकांना या दोन दिवसांत पंढरपूरला दर्शनासाठी येण्याचे नियोजन टाळण्याचे आवाहन केले आहे. मंदिरातील तांत्रिक काम सुरळीत पार पडावे आणि मूर्तीचे पावित्र्य कायम राखले जावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

विठ्ठलाच्या मूर्तीची नैसर्गिक झीज होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समिती, वारकरी प्रतिनिधी आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत मूर्ती संवर्धनासाठी पारंपरिक तसेच वैज्ञानिक पद्धतींचा विचार करण्यात आला. अखेरीस तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रासायनिक पद्धतीने संरक्षक लेपन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रक्रियेसाठी 22 ते 24 जूनदरम्यान विशेष काम करण्यात येणार आहे. मूर्तीच्या पायाजवळ झीज झाल्याचे तसेच काही भागांमध्ये किरकोळ नुकसान झाल्याचे तज्ज्ञांच्या निरीक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे मूळ दगडाशी सुसंगत दगडी पावडर आणि विशेष सेंद्रिय रसायनांच्या मदतीने झिजलेल्या भागांची सूक्ष्म दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच मूर्तीचे आयुष्य वाढवण्यासाठी संरक्षक आवरण (Protective Coating) दिले जाणार आहे.
संवर्धनाच्या काळात भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि तांत्रिक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी 23 जून आणि 24 जून रोजी मंदिरातील सर्व प्रकारचे दर्शन बंद राहणार आहे. या कालावधीत सर्वसामान्य भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता येणार नाही. ही संपूर्ण प्रक्रिया भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (ASI), राज्य पुरातत्त्व विभाग आणि मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. वैज्ञानिक पद्धतीने मूर्तीचे जतन करून भविष्यातील पिढ्यांसाठी विठुरायाचा ऐतिहासिक वारसा सुरक्षित ठेवणे हा या संवर्धनाचा मुख्य उद्देश आहे. यापूर्वीही विठ्ठलाच्या मूर्तीवर वेळोवेळी संवर्धनाची कामे करण्यात आली आहेत. सन 1988, 2005, 2012 आणि 2020 मध्ये मूर्तीवर लेपन व संरक्षणाची प्रक्रिया करण्यात आली होती. आता जवळपास पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा संवर्धनाची गरज निर्माण झाल्याने ही विशेष मोहीम राबवली जात आहे.
आषाढी वारीसाठी राज्यभरातून आणि देशाच्या विविध भागांतून लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. त्यापूर्वी मूर्ती संवर्धनाचे काम पूर्ण करून नियमित दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्याचा मंदिर प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे भाविकांनी 23 आणि 24 जून रोजी पंढरपूर दर्शनाचे नियोजन करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.



