नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला विधानपरिषद निवडणुकीचा सस्पेन्स अखेर संपला असून आज भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
विधानपरिषद निवडणुकीत अनेक जागांवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये वाद निर्माण झाला होता. यातील नाशिक आणि जळगाव येथील भाजप-शिवसेनेतील वाद विकोपाला गेले होते. नाशिक येथे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात भाजपचे बंडखोर गोकुळ गिते यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना समजवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्याने मोठा पेच निर्माण झाला होता.

अखेर दिल्लीवरून आलेल्या आदेशानंतर गिते यांनी दराडे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेत याबाबतची माहिती आज जाहीर केली. नाशिकमध्ये आज महायुतीच्या प्रमुख मंत्र्यांची बैठक पार पडली. यात जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, दादा भुसे यांच्यासह स्थानिक नेत्यांची उपस्थिती होती. यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यात गोकुळ गिते यांनी माघार घेत आपण शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठींबा देत असल्याची घोषणा केली. यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, भाजपच्या बंडखोर उमेदवाराने माघार घेताच याचेच पडसाद जळगावात उमटणार का ? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. खरं, तर शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी आपण निवडणूक लढविणारच असा पवित्रा घेतल्याने हा पेच वाढला आहे. तथापि, आता नाशिकमधील वाद मिटल्याने जळगाव मध्ये देखील काळे यांची माघार होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



