
चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वाभिमान आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराच्या स्मृतींना उजाळा देत अडावद येथे २५३ वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी शिवप्रेमींनी महाराजांच्या प्रतिकृतीस जलाभिषेक करून अभिवादन केले, तर ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक ध्वज फडकवून स्वराज्याच्या आदर्शांना वंदन करण्यात आले.

६ जून रोजी सकाळी दहा वाजता अडावद येथील विघ्नहर्ता चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीस जलाभिषेक करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ जून १६७४ रोजी स्वराज्यनिर्मितीच्या ध्येयाला मूर्त स्वरूप देत रयतेचे लोकाभिमुख राज्य उभे केले, याची आठवण उपस्थितांनी करून दिली. यावेळी बोलताना मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेच्या मनात स्वाभिमान निर्माण केला, जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेचा विचार जपणारे आदर्श राज्य निर्माण केले आणि लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले, असे सांगितले. शिवराज्याभिषेक दिन हा भारतीयांच्या स्वाभिमानाचा आणि स्वातंत्र्याच्या प्रेरणेचा दिवस असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
कार्यक्रमास सरपंच बबनखा तडवी, चोपडा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर देशमुख, माजी संचालक मनोज देशमुख, कामधेनू दूध डेअरीचे माजी चेअरमन संजय पाटील, उमेश देशमुख, विकासोचे माजी चेअरमन भुषण देशमुख, अनिल देशमुख, राजेश देशमुख, माजी पीक संरक्षण संस्थेचे चेअरमन मधुकर कासार, हरीश पाटील, आबा देशमुख, छोटू महाराज यांच्यासह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते. यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष ध्वजारोहण करून उपस्थितांनी महाराजांच्या कार्याचा गौरव केला. ग्रामपंचायत परिसरात शिवगर्जना आणि देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.
या कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच बबनखा तडवी, ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद सैंदाने, ग्रामपंचायत सदस्या अन्नपूर्णाबाई विठ्ठल बारेला, कुसुम मनोहर पाटील, सदस्य तुषार देशमुख, मनोहर पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा अधिक संस्मरणीय ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्मरण करून स्वराज्याच्या मूल्यांचा जागर करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. अडावदमध्ये मोठ्या उत्साहात साजऱ्या झालेल्या या सोहळ्याने शिवप्रेमींच्या मनात स्वराज्याविषयीचा अभिमान आणि प्रेरणा अधिक दृढ केली.



