
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर व यावल तालुक्यात सोमवारी सायंकाळी आलेल्या जोरदार वादळ, वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे शेतीपिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी वर्गासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे. काढणीच्या टप्प्यावर आलेल्या हजारो हेक्टरवरील केळी बागा वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्याचे चित्र अनेक भागांत पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्या हाती आलेला घास हिरावला गेला आहे. याशिवाय अनेक गावांमध्ये घरांवरील पत्रे उडून जाणे, झाडे कोसळणे तसेच वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेत रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी महसूल, कृषी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानग्रस्त भागांची त्वरित पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वादळाचा प्रभाव सुरू असल्याने तत्काळ प्रत्यक्ष पाहणी शक्य नसली तरी प्रशासनाला युद्धपातळीवर तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आमदार जावळे यांच्या सूचनेनुसार उद्या सकाळपासून महसूल व कृषी विभागाचे अधिकारी गावनिहाय पाहणी करून नुकसानग्रस्त शेतजमिनी, केळी बागा तसेच घरांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळावा यासाठी अचूक व पारदर्शक पंचनामे करण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वास्तव मूल्यांकन करून शासनाकडे तातडीने मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात यावा, तसेच नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याचे आदेश आमदार जावळे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
यावेळी बोलताना आमदार अमोल जावळे म्हणाले की, “वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकरी व नागरिकांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रशासनाच्या सतत संपर्कात आहोत. प्रत्येक नुकसानग्रस्तापर्यंत मदत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. कोणत्याही शेतकरी किंवा नागरिकावर अन्याय होऊ दिला जाणार नाही.”
दरम्यान, प्रशासनाकडून उद्यापासून नुकसानग्रस्त भागांची पाहणी व पंचनामे युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार असून, सर्व अहवाल प्राप्त होताच शासनाकडे मदतीचा प्रस्ताव तातडीने पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. वादळग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा मिळावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व शेतकरी व्यक्त करत आहेत.



