
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । काळी शिवार परिसरातील शेतकऱ्यांमध्ये वीज वितरण प्रणालीवर अनधिकृत जोडण्यांमुळे मोठा संताप पाहायला मिळत आहे. वारंवार ट्रान्सफॉर्मर जळण्याची भीती व्यक्त करत शेतकऱ्यांनी महावितरणकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

माहितीप्रमाणे, काळी शिवार डीपीवर आधीच मोठ्या प्रमाणावर लोड आहे. शेतकऱ्यांनी २०२३-२४ मध्ये स्वतःच्या खर्चाने मिनी ट्रान्सफॉर्मर बसवून वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच स्वखर्चाने खांब उभारून लाईन केलेली होती. मात्र अलीकडच्या काळात काही व्यक्तींनी महावितरणची परवानगी न घेता आणि कोणताही खर्च न करता, ठेकेदारांकडून रातोरात खांब उभे करून अनधिकृत कनेक्शन जोडले आहेत.
वाढीव लोडमुळे ट्रान्सफॉर्मरवर तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता वाढली असून, ऐन शेतीच्या हंगामात वीज पुरवठा खंडित झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहाय्यक अभियंत्यांना लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात किसन तानाजी धनगर, बाळकृष्ण काशिराम चौधरी, निवृत्ती गोपाळ कोळंबे, विकास निनू चौधरी, राजेंद्र भास्कर झांबरे, प्रभाकर सोपान झोपे, नितीन पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जर महावितरणने अनधिकृत जोडणीवर योग्य कारवाई केली नाही, तर इतर शेतकरी देखील संतापून अशाच प्रकारच्या जोडण्यांसाठी पुढे येऊ शकतात, आणि यंत्रणा पूर्णपणे धोक्यात येऊ शकते, असा इशारा निवेदनात दिला आहे.



