Home Uncategorized तापी नदीपात्रात बुडून तिघांचा मृत्यू : गोंधळ जागरणाला आलेल्यांवर काळाची क्रूर झडप...

तापी नदीपात्रात बुडून तिघांचा मृत्यू : गोंधळ जागरणाला आलेल्यांवर काळाची क्रूर झडप !

0
214

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अंजाळे येथे तापी नदीपात्रात बुडणाऱ्या बालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची आई व मावशी यांच्यासह तीन जण बुडून मरण पावल्याची हृदयद्रावक घटना घडल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, अंजाळे येथील घाणेकर नगरात बादल लहू भील हा तेवीस वर्षाचा युवक वास्तव्याला असून तो जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करतो. काल खंडोबाचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्याने त्यांच्या बहिणींसह आप्त हे घरी आलेले होते. त्यांची मावस बहिण वैशाली सतीश भील ( रा. अंतुर्ली, ता. अमळनेर ) आणि मामेबहिण सपना गोपाळ सोनवणे (रा. पळाशी, ता. सोयगाव ) यांचा समावेश होता. काल जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाल्यानंतर आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ते तापी नदीवर आंघोळीसह कपडे धुण्यासाठी गेले. याप्रसंगी वैशाली सतीश भील यांचा मुलगा नकुल ( वय वर्षे पाच ) हा अचानक पाय घसरून पाण्यात पडल्याने गटांगळ्या खाऊन बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याची आई वैशाली भील आणि मावशी सपना सोनवणे यांनी उडी घेतली. या दोन्ही जणींना देखील पोहता येत नसल्याने हे तिन्ही जण पाण्यात बुडाले.

दरम्यान, यांच्यासोबत नदीवर गेलेल्या अनु सतीश भील या बालिकेने घरी धावत येऊन याची माहिती दिली. यानंतर पोहणाऱ्यांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना पाण्याबाहेर काढले. मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला होता.

या दुर्घटनेत अंतुर्ली ता. अमळनेर येथील वैशाली सतीश भील व त्यांचा पाच वर्षाचा मुलगा नकुल तसेच पळाशी येथील सपना गोपाळ सोनवणे या तिघांचा मृत्यू झाला. एकचदा तिघांचा मृत्यू झाल्याने अंजाळे गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी यावल पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound