
धरणगाव – अविनाश बाविस्कर | धरणगाव आणि पिंप्री दरम्यान असलेल्या पाण्याची पाटचारी धरणगाव तालुक्यातील कल्याणी-होळ या गावाजवळून गेली आहे. नाल्यावरून गेलेल्या पाटचारीची भिंत जीर्ण झाल्याने मंगळवारी २० डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास भिंत फुटल्याने पाटचारीतील पाणी परिसरातील शेतात गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अधिक माहिती अशी की, धरणगाव आणि पिंप्री गावाच्या दरम्यान गेलेल्या पाण्याची पाटचारी हे अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी हिताची ठरलेली आहे. गिरणा पाटबंधारे विभाग अंतर्गत या पाठचारीची देखभाल केली जाते. पाचोरा तालुक्यातील दहिवद येथील धरणातून पाण्याचे आवर्तन या पाटचारीत सोडले जाते. या आवर्तनाच्या माध्यमातून धरणगाव तालुक्यातील शेतकरी हे गहू, मका, हरभरा हे पीक काढतात. यंदा धरणात मुबलक पाणीसाठा आल्याने गिरणा पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत पहिल्या आवर्तन सोडण्यात आले होते. दरम्यान धरणगाव तालुक्यातील कल्याणी होळ येथी नाल्यावरून ही पाटचारी केली आहे. दरम्यान येथे बांधण्यात आलेली ही भींत जीर्ण झाल्यामुळे मंगळवारी २० डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास अचानक फुटला. यातून पाण्याची नासाडी होऊन आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गिरणा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता विजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दरम्यान हा बंधारा जीर्ण झाल्यामुळे फुटला असावा असा अंदाज देखील यावेळी करण्यात आला आहे. दरम्यान शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी देखील मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.


