जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ऋषीपंचमी निमित्त अंघोळीसाठी गेलेल्या विवाहितेचा तापीनदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत उशीरापर्यंत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
विद्या प्रल्हाद पाटील रा. पिंपळे सिम ह.मु. चोपडा जि.जळगाव असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विद्या पाटील ह्या पती प्रल्हाद गोपीचंद पाटील यांच्यासह चोपडा येथे वास्तव्याला आहे. १ सप्टेंबर रोजी ऋषीपंचमी असल्याने गल्लीतील महिलांसोबत विद्या पाटील देखील गेल्या होत्या. चोपडा-धरणगाव रस्त्यावरील तापीनदीजवळ दादाई मंदीराजवळ असलेल्या तापीनदीच्या पायऱ्यांजवळ उतरल्या. नदीच्या पाण्यात आंघोळ करतांना अचानक त्यांचा तोल गेल्याने त्या पाण्यात बुडाल्या. दरम्यान, त्यांचा मृतदेह तांदलवाडी गावाजवळील नदीच्या थळीवर आढळून आला आहे. नातेवाईकांनी मयत महिलेची ओळख पटविली आहे. याबाबत रात्री उशीरा पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. मयत महिलेच्या पश्चात सासरे गोपीचंद नथ्थू पाटील, पती प्रल्हाद पाटील, दीर, आई, वडील असा परिवार आहे.