चाळीसगाव प्रतिनिधी | गिरणा नदीच्या पुनरूज्जीवनासह विविध मागण्यांसाठी गिरणा परिक्रमा करणारे खासदार उन्मेषदादा पाटील यांचे परिश्रम आता फलद्रूप होण्याचे संकेत मिळाले आहेत. केंद्रीय जलमंत्र्यांनी त्यांच्या सर्व मागण्यांना हिरवा कंदील दाखविल्याने ही परिक्रमा खर्या अर्थाने यशस्वी होणार आहे.
खासदार उन्मेषदादा पाटील यांनी १ जानेवारीपासून गिरणा परिक्रमा सुरू केली आहे. ३८० किलोमीटरची गिरणा नदी परिक्रमा केंद्रीय जलशक्ती मंत्रालयात पोहचली असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खासदार उन्मेशदादा पाटील यांनी दिल्लीत केंद्रिय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेऊन सात बलून बंधारेसह, तापी निन्म पाडळसरे प्रकल्पाचा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेशासाठी साकडे घातले असून केंद्रिय जलशक्ती मंत्री ना. गजेन्द्रसिंग शेखावत यांनी हिरवा कंदील दिला आहे.

गुरूवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ति मंत्री गजेंद्र शेखावत यांची माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत खासदार उन्मेशदादा पाटील यांनी नवी दिल्ली येथे भेट घेतली. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी तापी निन्म पाडळसरे प्रकल्पाचा धरण पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कारकीर्दीत झालेल्या प्रवासाचा लेखाजोखा केंद्रीय जलशक्ती मंत्रालया समोर मांडत कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत तापी निम्न पाडळसरे प्रकल्पाचा समावेश करावा. यासाठी आग्रह धरला.
यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी गिरणा पुनरूज्जीवन अभियानातून सात बलुन बंधारे बाबत जनजागृती करीत गिरणेचे वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी गिरणाकाठावरील ग्रामस्थांशी संवाद साधत असुन सात बलून बंधारेसह, तापी निन्म पाडळसरे प्रकल्पाचा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेशासाठी मंत्र्यांनाविनंती केली आहे.
जलशक्ती मंत्रालय अनुकूल
खासदार उन्मेशदादा पाटील यांनी या भेटीत गिरणा नदीवरील सुमारे पूर्ण झालेला वरखेड लोंढे आणि सात बलून बंधारे यांच्या पूर्णत्वामुळे गिरणेत बारमाही पाणी राहील. त्यामूळे गिरणाकाठ अधीक समृध्द होणार आहे.त्याच प्रमाणे खानदेशातील सर्वात मोठा आणि अवर्षणप्रवण सहा तालुक्यांना वरदान ठरणार्या तापी नदीवरील पाडळसे धरण हे येत्या काळात उपेक्षित न राहता त्याला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश केल्यास हा प्रकल्प मार्गी लागणार असल्याचा आग्रह केंद्रिय मंत्री यांच्याकडे धरला होता.
यावर केंद्रिय मंत्री नामदार शेखावत यांनी तापी निन्म पाडळसरे प्रकल्पबाबत प्रधानमंत्री जलसिंचन योजनेत समावेशाबाबत जलशक्ती मंत्रालय अनुकूल असुन लवकरच निधीबाबत तरतूद होईल असे आश्वस्त केले आहे. त्यामुळे येत्या काळात सुमारे दोन ते तीन हजार कोटी रुपयांच्या खर्चातून ५० हजार हेक्टर क्षेत्र बारमाही ओलिताखाली येणार असल्याने अवर्षणग्रस्त अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, शिंदखेडा, धुळे तालुक्यासाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे.
बलून बंधार्यांसाठी राज्य सरकारच्या पर्यावरण मान्यता प्रस्तावाची केंद्राला प्रतीक्षा
सात बलून बंधार्यांच्या सर्व मान्यता मिळाल्या असून आता राज्य सरकारच्या वतीने पर्यावरण मान्यता प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आलात तरच सात बलून बंधार्याच्या निधी मंजुरीचे काम मार्गी लागणार आहे. संपूर्ण निधी हा केंद्र सरकार देणार असून राज्य सरकारने पर्यावरण मान्यतेसाठी लवकर प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्यास सात बलून बंधारे प्रस्तावावर देखील लवकर कार्यवाही करण्यात येईल.अशी हमी जलशक्ती मंत्री ना.गजेंद्रसिंग शेखावत यांनी यावेळी दिली असुन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्याचे मंत्री महोदयांनी कौतुक केले आहे.



