कोलकाता वृत्तसंस्था । विराट कोहली आणि मोईन अली यांच्या दणकेबाज फलंदाजीच्या जोरावर आरसीबी बंगळूर संघाने कोलकाता नाईट रायडर्सला १० धावांनी हरविले.
आरीसीबी संघाचे सलामीवीर पार्थिव पटेल आणि अक्षदीप नाथ लवकर बाद झाले. मात्र यानंतर विराट कोहली आणि मोईन अली यांनी तिसर्या विकेटसाठी मोठी भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी कोलकात्याच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. या भागीदारीमुळेच बंगळुरुने तब्बल २१३ धावसंख्येचा पल्ला गाठला. मोईन अलीने ६६ तर कर्णधार विराट कोहलीने ५८ चेंडूत १०० धावांची खेळी केली. कोलकात्याकडून सुनील नरीन, आंद्रे रसेल, हॅरी गुर्ने आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
२१४ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकात्याची सुरुवात खराब झाली. सलामीवीर ख्रिस लिन, सुनील नरिन आणि शुभमन गिल हे फलंदाज लवकर परतले. यानंतर भरवशाचा रॉबिन उथप्पाही झटपट माघारी परतला. यानंतर मैदानात आलेल्या नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांनी अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी केली. नितीश राणाने नाबाद ८५ तर रसेलने ६६ धावा केल्या. मात्र त्यांचे प्रयत्न अपूर्ण पडले. व आरसीबीने १० धावांनी विजय मिळविला.