जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामातील ९५ टक्के पेरण्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील ९५ टक्के पूर्ण झाल्या आहेत. आज‌ अखेरपर्यंत ७ लाख ३८ हजार ५२० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. खान्देशचे पीक म्हणून ओळख असणाऱ्या कापसाच्या ५ लाख ५८ हजार ७८० हेक्टर क्षेत्रावर सर्वाधिक पेरण्या झाल्या आहेत.

 

जिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण सरासरी क्षेत्र ७ लाख ६९ हजार ६०१ हेक्टर इतके आहे. यंदाच्या खरीप हंगामात जून महिना हा कोरडा गेला आहे. कापूस लागवडीस उशीर झाला मात्र जुलैपासून महिन्यांपासून चांगला पाऊस पडण्यास सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळेच खरीप पेरण्यांना गती आली आहे.  जिल्ह्यात खरीप हंगामात खरीप ज्वारी, बाजरी, मका, इतर तृणधान्य, तूर, मूग, उडीद, इतर कडधान्य, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन , इतर गळीतधान्य, कापूस तसेच नवीन ऊस पिकाची लागवड ही केली जाते.

 

जिल्ह्यात खरीप हंगाम ऊस पिक वगळून ७३४६०६ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तर नवीन ऊस पिक लागवडीसह ७३८५२० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. कापसाखालोखाल मका – ८६१९९ हेक्टर क्षेत्रावर, ज्वारी- २०७६२ ,सोयाबीन – १७७१८, उडीद – १४७५८, तूर – १०८२५ , मूग – १३७८७, बाजरी – ७८५४ , नवीन ऊस लागवड – ३९१४,  इतर तृणधान्य – २३६०, भुईमूग – ९००, इतर कडधान्य – ४६४ , तीळ – १७४, सूर्यफूल – १४ व इतर गळीतधान्य ११ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

Protected Content