३१ हजार रिळांचा चित्रपट वारसा नष्ट !

 

nfai reels 759

 

 

पुणे (वृत्तसंस्था) देशातील चित्रपट वारशाचे जतन करणाऱ्या पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडील ३१ हजारांपेक्षा अधिक रिळे गहाळ किंवा नष्ट झाली आहेत. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात ‘कॅग’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. दुर्मिळ चित्रपटांची ३१ हजार रिळे गहाळ किंवा नष्ट होण्याने चित्रपट जतन चळवळीला मोठा हादरा बसला आहे. ‘कॅग’ने ठपका ठेवल्यानंतर तरी आता लाखो संख्येने असलेल्या चित्रपट साहित्याचे योग्य पद्धतीने जतन होणार का ? असा सवाल उपस्थित झाला आहे.

 

चित्रपट संग्रहालयाकडे चित्रपटांची रिळे, व्हिडिओ कॅसेट, डीव्हीडी, पुस्तके, पोस्टर, प्रेस क्लिपिंग, ध्वनिफिती असे १०६ वर्षांतील दुर्मीळ चित्रपट साहित्य आहे. संग्रहालयामध्ये २०१० मध्ये माहिती नोंदविण्याचे (डेटा एन्ट्री) काम सुरू झाले. एकूण तीन लाख सत्तर हजार या संख्येने असलेल्या चित्रपट साहित्याला बारकोड लावण्याचे काम करण्यात आले. २०१६-१७ मध्ये चित्रपटांची १ लाख ३२ हजार रिळे उपलब्ध होती. बारकोड लावण्याचे काम केलेल्या ठेकेदाराच्या बिलानुसार १ लाख ३७७ रिळे उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. यादरम्यान, ३१ हजार २६३ रिळांचे डबे हरवले किंवा नष्ट करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘कॅग’ने १ मे २०१५ ते ३० सप्टेंबर २०१७ या कालावधीत संग्रहालयातील साहित्याची तपासणी केल्यानंतर ही तफावत उघड झाली आहे. आधी नोंदवलेली माहिती आणि रिळांची प्रत्यक्षातील संख्या यामधील फरकावरून ‘कॅग’ने संग्रहालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
रिळे भरली पोत्यात – देशातील चित्रपटाचा वारसा जतन करण्यासाठी केंद्र सरकारने १ फेब्रुवारी १९६४ रोजी संग्रहालयाची स्थापना केली. देशात केवळ पुण्यात असलेली ही संस्था केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत काम करते. चित्रपटाचा वारसा जतन करणे, रिळांचे जतन व संवर्धन, चित्रपट साहित्याचे जतन, चित्रपटाबद्दल जागृती वाढवणे, असे प्रमुख काम असलेल्या संग्रहालयाला ‘कॅग’च्या अहवालामुळे दणका बसला आहे. संग्रहालयाने दुर्लक्ष केल्याने चित्रपट वारशाचे मोठे नुकसान झाले आहे. आजही चित्रपटांची रिळे व इतर साहित्य पोत्यात भरून ठेवल्याचे उघड झाले आहे. रिळांचे जतन करण्यासाठी विशिष्ट तापमानाची गरज असताना वॉल्टमध्ये पंख्याच्या हवेत रिळे ठेवण्यात आल्याचे सिद्ध झाले होते. सतत खर्च करूनही वातानुकूलन यंत्रणा बंद पडत असल्याने या रिळांचे मोठे नुकसान झाले आहे.

Add Comment

Protected Content