महास्वच्छता अभियानाच्या पहिल्या दिवशी ३०८ टन कचरा संकलन!

जळगाव प्रतिनिधी । शहरात साफसफाईच्या नावे ओरड होत असल्याने महापौर सौ.भारती सोनवणे यांनी महास्वच्छता अभियान हाती घेतले. सोमवारी शिवाजी नगरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभियानाला सुरुवात करण्यात आली. प्रभागात पाहणी करताना अस्वच्छतेसह नागरिकांनी अमृत योजना व भूमीगत गटारींमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून चाऱ्या योग्यप्रकारे बुजविण्यात येत नसल्याची नागरिकांनी तक्रार केली. दरम्यान, अभियानाच्या पहिल्या दिवशी ३०८ टन कचरा संकलीत करण्यात आला.

महास्वच्छता अभियानाच्या सुरुवात प्रसंगी महापौर सौ.भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, चेतन सनकत, नवनाथ दारकुंडे, मनोज आहुजा, कांचन सोनवणे, सरिता नेरकर, गायत्री शिंदे, किशोर बाविस्कर, प्रवीण कोल्हे, मंगेश जोहरे, भरत सपकाळे, उत्तम शिंदे, शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश बोरोले आदींसह मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर वचक ठेवावा

जळगाव शहराच्या साफसफाईसाठी ८०० कर्मचारी आहेत. दररोज १०० कर्मचारी जरी सुट्टीवर असले तरीही योग्यप्रकारे साफसफाई होऊ शकते. अधिकाऱ्यांनी आणि आरोग्य निरीक्षकांनी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांवर वचक ठेऊन काम करून घेतल्यास कुणाचीही ओरड राहणार नाही. प्रत्येक अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांवर वचक ठेवावा अशा सूचना आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी दिल्या.

एलईडीच्या कामाला सुरुवात करा

शिवाजीनगर परिसरात जवळपास ७५० खांब असून त्यावर एलईडी बसविण्यात आले नसल्याची माहिती नागरिकांनी दिली. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी लागलीच विद्युत विभागाला सूचना देत काम सुरू करण्याचे सांगितले. गुरुवारपासून कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येऊन २ दिवसात काम पूर्ण होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच हरिओम नगरात देखील एलईडी बसविले नसल्याची तक्रार नगरसेवकांनी मांडली असता महापौरांनी सूचना दिल्या.

गटारींची स्वच्छता होत नाही, घाण २ दिवस जागीच पडून

शिवाजी नगर, भारत नगर, हरिओम नगर, प्रजापत नगरात गटारींची स्वच्छता नियमीत होत नाही. गटारीतून काढलेली घाण २ दिवस उचलण्यात येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. नगरसेवकांच्या घरासमोर कर्मचारी दररोज सफाई करून निघून जात असल्याची माहिती नगरसेवक आणि नागरिकांनी दिली. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी लागलीच मनपा अधिकारी आणि आरोग्य निरीक्षकांची कानउघडणी करत दररोज साफसफाई करण्याच्या सूचना केल्या. कोणत्या प्रभागात मनुष्यबळ कमी असल्यास ते वाढवावे असेही त्या म्हणाल्या.

नाल्यांच्या सफाईसाठी जेसीबी वापरा

दूध फेडरेशन मागील बाजूला असलेल्या नाल्यात कचरा जमा झाल्याने पाणी तुंबून दुर्गंधी पसरते अशी तक्रार नगरसेवकांनी दिली. तसेच हरिओम नगरात रेल्वे सुरक्षा भिंतीला लागून असलेला नाला साफ केला जात नसल्याने पाणी तुंबून डास, मच्छर, सापांचा त्रास होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. महापौरांनी लागलीच सूचना देत नालेसफाईकामी जेसीबी उपलब्ध करून घ्यावे असे सांगितले.

रस्त्यांच्या डागडुजीसाठी मनुष्यबळ वाढविणार

जळगाव शहरात अमृत योजना आणि भूमीगत गटारींच्या कामासाठी खोदलेल्या चाऱ्या योग्य पद्धतीने बुजविण्यात आलेल्या नसून खडी बाहेर येत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. अमृतच्या नळ संयोजनची जोडणी झालेली असो किंवा नसो चाऱ्या दुरुस्ती तात्काळ करावी. चाऱ्या योग्य पध्दतीने रस्त्यांच्या समांतर करण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचना महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिल्या. तसेच प्रजापत नगरातील कुंभार वाड्याचा मुख्य रस्ता डांबरीकरण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचेही त्यांनी सांगितले.

जुना असोदा रोडवरील नागरिकांच्या तक्रारीसाठी मनपात बैठक

जुना असोदा रोड परिसरात असलेला एक जुना वहिवाटचा रस्ता संबंधित शेतमालकाने तारेचे कंपाउंड बांधत बंद केल्याने नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी मांडली. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी संबंधित शेतमालक, स्थानिक रहिवासी आणि मनपा अधिकाऱ्यांना आपल्या दालनात बोलावून घेत तातडीने बैठक घेतली. सर्व माहिती जाणून घेतल्यावर सदर प्रकरणात तहसीलदार मार्ग काढू शकत असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली. महापौरांनी नागरिकांना तहसीलदार यांची भेट घेण्याचे सांगितले. तसेच संबंधित शेतमालक भविष्यात ती जागा अकृषक वापरासाठी घेत असल्यास त्याठिकाणी रस्ता करण्यात यावा यासाठी नगररचना विभागाला पत्र देण्याचे सांगितले.

महापौरांच्या दौऱ्याचा दणका, गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस, दंड

महापौर सौ.भारती सोनवणे या सोमवारपासून महास्वच्छता अभियान राबविणार असल्याने गैरहजर राहू नये याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. सोमवारी मनपाच्या ४७५ कायम कर्मचाऱ्यांपैकी ४०३ तर मक्तेदाराचे ४०० पैकी ३३७ कर्मचारी हजर होते. मनपाच्या ५४ गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली तर मक्तेदाराच्या ६३ गैरहजर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला आहे.

दिवसभरात उचलला ३०८ टन कचरा

सोमवारी ८७५ पैकी ७४० कर्मचारी हजर तर १३५ गैरहजर होते. त्यात १८ वैद्यकीय व अग्रीम रजेवर होते. सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत शहरातून ३०८ टन कचरा संकलित करण्यात आला. एरव्ही दर दिवसाला सरासरी २७० टन कचरा संकलन केला जातो. प्रभाग १ ते ६ मधून तब्बल ३८ टन अतिरिक्त कचरा संकलन करण्यात आले. स्वच्छता मोहीममुळे इतर प्रभागात अडचण होऊ नये यासाठी प्रत्येक प्रभागात काही कामगार ठेवण्यात आले होते.

 

Protected Content