जिल्ह्यातील नुकसान भरपाईचा १७६ कोटी रूपयांचा मदत निधी मिळण्याचा मार्ग मोकळा

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे प्रचंड प्रमाणावर मोठे नुकसान झाले होते.  घर पडझड, पशुहानी, गोठे, झोपड्या, कपडे, भांडी सर्व नुकसान झाले होते. यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी १०२ कोटी ८८ लाख रूपयांची मागणी केली होती. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ हा निधी देण्याच्या सुचना संबंधित विभागाला देण्यात आले. आता जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यासाठी १७६ कोटी रूपयांच्या निधीचा मार्ग मोकळा झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील यंदा अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळी वारे व पूर परिस्थितीमुळे पीकांच्या झालेल्या नुकसानीसह घर पडझड, पशुहानी, गोठे, झोपड्या, कपडे, भांडी आदींसाठीचे ७४ कोटी ८८ लक्ष रूपये तर २०१७ पासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी प्रलंबीत असणार्‍या १०२ कोटी ९ लक्ष रूपयांच्या मदत निधीचा मुद्दा आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत उपस्थित केला. जळगाव जिल्ह्यास या निधीचे तातडीने वितरण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ हा निधी प्रदान करण्याचे निर्देश दिले असल्याने आता जिल्ह्यातील आपदग्रस्त शेतकर्‍यांना तब्बल १७८ कोटी रूपयांचा मदतनिधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, २०२१ मध्ये झालेला अतिवृष्टी, वादळी वारे व पूर परिस्थितीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. यात जानेवारी ते सप्टेंबर २०२१ पर्यंत ३ कोटी ४३ लक्ष रूपयांचे अनुदान मिळाले असून ६७ कोटी ५७ लाख रूपयांचे अनुदान अद्यापही प्रलंबीत आहे. तर यंदाच झालेल्या अतिवृष्टीमुळे पीकांच्या झालेल्या नुकसानीसह घर पडझड, पशुहानी, गोठे, झोपड्या, कपडे, भांडी आदींसाठी ७ कोटी ३१ लाख रूपयांची मदत बाकी आहे.

 

यासोबत २०१७ च्या खरीप हंगामापासून ते ऑक्टोबर २०२० पर्यंत जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या हानीचे अनुदान अद्यापही प्रलंबीत आहे. यात २०१७ च्या खरीप हंगामात कापूस पिकावरील बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी ४३६ कोटी ४० लक्ष रूपयांची मदत प्रदान करण्यात आली असून अजून ११ कोटी ७० लाख रूपयांची मदत बाकी आहे. २०१८च्या खरीप हंगामातील दुष्काळाबाबत ४०२ कोटी ९७ लाख रूपयांचे अनुदान वाटप करण्यात आले असून ५० कोटी ७३ लक्ष रूपयांची मदत अद्याप बाकी आहे. ऑक्टोबर – नोव्हेंबर २०१९ मध्ये आलेल्या क्यार हा महा चक्री वादळामुळे झालेल्या हानीचा विचार केला असता ४७९ कोटी ९३ लक्ष रूपयांची मदत शेतकर्‍यांना मिळाली असून अद्यापही ४ कोटी ३३ लक्ष रूपयांची मदत बाकी आहे. जुलै ते सप्टेंबर २०१९ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीपोटी ११ कोटी ९४ लक्ष रूपयांची मदत मिळाली असून ३५ कोटी ३१ लक्ष रूपयांची मदत अजून बाकी आहे.

 

अशा प्रकारे यंदाचे ७४ कोटी ८८ लक्ष आणि २०१७ ते २०२० च्या दरम्यानच्या नुकसानीचे १०२ कोटी ९ लक्ष रूपये अशा एकूण १७६ कोटी ९७ लक्ष रूपयांच्या मदतीचा मुद्दा आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडला. शेतकर्‍यांनी अतिवृष्टीमुळे मोठी हानी झाली असल्याने हा मदत निधी मिळावा म्हणून जिल्हा प्रशासनाने वारंवार पाठपुरावा करून देखील तो मिळाला नसल्याकडे ना. पाटील यांनी मंत्रीमंडळाचे लक्ष वेधून घेतले. यावर चर्चा होऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळाने आजची बिकट स्थिती लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यास हा मदतनिधी तातडीने प्रदान करण्याचे निर्देश दिले. यामुळे आता जिल्हातील आपत्तीग्रस्तांना १७६ कोटी ९७ लक्ष रूपयांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला आहे. लवकरच सदर अनुदान प्राप्त होणार असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Protected Content