५ वर्षात १७० आमदारांनी काँग्रेस पक्ष सोडला

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । २०१६ ते २०२० या ५ वर्षांच्या काळात देशभरात काँग्रेसच्या तब्बल १७० आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत इतर पक्षांचा रस्ता धरल्याची आकडेवारी समोर आली आहे.

 

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने सादर केलेल्या अहवालामधून ही आकडेवारी जाहीर झाली सत्ताधारी भाजपमधून मात्र फक्त १८ आमदारांनी बाहेरची वाट धरली आहे. . २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या भाजपाने २०१९ मध्ये देखील मोठा विजय मिळवत ३०० हून जास्त खासदार संसदेत निवडून आणले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाला सोडून जाणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या कमी असणं अपेक्षितच असल्याचं म्हटलं जात आहे.

 

 

 

एडीआरच्या नव्या अहवालानुसार, २०१६ ते २०२० या कालावधीमध्ये देशभरात एकूण ४०५ विद्यमान आमदारांनी निवडणुका लढवल्या. त्यापैकी १७० आमदारांनी आपला पक्ष बदलून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यापाठोपाठ ३८ आमदारांनी काँग्रेसमध्ये तर २५ आमदारांनी तेलंगणा राष्ट्र समिती पक्षामध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय, २०१९च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान भाजपाच्या ५ विद्यमान खासदारांनी देखील पक्षाला रामराम केला तर काँग्रेसच्या ७ राज्यसभा खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

 

या कालावधीमध्ये मध्य प्रदेश, मणिपूर, गोवा, अरुणाचल प्रदेश आणि कर्नाटक या ५ राज्यांमध्ये सत्ताबदल झाले आहेत. यामध्ये आमदारांनी मोठ्या प्रमाणावर पक्षबदल केल्याचं दिसून आलं असल्याचं देखील या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या कालावधीत १६ राज्यसभा खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे तर ५ लोकसभा खासदार काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.

Protected Content