१२ दिवसात ८ आंदोलक शेतकऱ्यांचे मृत्यू

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । १२ दिवसांमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये आठ आंदोलक शेतकऱ्यांचे मृत्यू दिल्ली परिसरात झाले आहेत .

कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये आणखीन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. टिकरी सीमेजवळ आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्याची प्रकृती सोमवारी अचानक खालावली. त्यानंतर या शेतकऱ्याला बहादूरगढमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या रुग्णालयामध्ये शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आला होता. सुरुवातीला काही काळ या शेतकऱ्याने उपाचारांना प्रतिसाद दिला मात्र आज सकाळी उपचारादरम्यान या व्यक्तीचं निधन झालं.हा शेतकरी आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून टिकरी सीमेजवळ सुरु असणाऱ्या आंदोलनात सहभागी होता.

यापूर्वी शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या गज्जर सिंह नावाच्या शेतकऱ्याचाही मृत्यू झाला होता. गज्जर सिंह यांचा मृत्युही हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता. बहादुरपगड बायपासजवळ न्यू बस स्टॅण्डजवळच त्यांचा मृत्यू झाला होता. गज्जर सिंह लुधियानामधील समराला येथील खटरा भगवानपूर गावचा रहिवाशी होता. ते ५० वर्षांचे होते. शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी हे आले होते.

दिल्लीच्या दिशेने निघालेल्या पंजाबमधील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्यानंतर तो दुरुस्त करण्यासाठी आलेल्या मेकॅनिकच्या गाडीला आग लागल्याने या मेकॅनिकचाही मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली. चारचाकी गाडीला आग लागल्याने मेकॅनिकचा होरपळून मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. पोलीस अधीक्षक राजेश दुग्गल यांनी जनकराज धनवाला मंडी येथील राहणारा असणारा हा तरुण आपले शेतकरी मित्र हरप्रीत, गुरप्रीत आणि गुरजंट सिंह यांच्यासोबत शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास बहादुरगड येथे आला होता. आंदोलनातील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर दुरुस्त करण्यासाठी तो आला होता. रात्री सर्वजण आपआपल्या जागी झोपण्यासाठी गेले होते. रात्री दीडच्या सुमारास शॉर्ट सर्कीटमुळे अचानक गाडीने पेट घेतला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

डिसेंबरच्या थंडीने जोर धरला असतानाही पंजाब आणि हरयाणामधील शेतकरी दिल्लीच्या सीमेजवळ आंदोलनासाठी रस्त्यावर ठिय्या मांडून बसले आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही आम्ही हटणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे. अनेक महिने आम्हाला रस्त्यावर रहावं लागलं तरी आम्ही तयार आहोत असं हे शेतकरी सांगत आहेत. शेतकऱ्यांच्या खाण्यापिण्यापासून ते औषधांपर्यंत अनेक गोष्टींची मदत सेवाभावी संस्थांकडून केली जात आहे.

Protected Content