१२० वर्षांनंतर फर्ग्युसनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर रचित आरतीचा निनाद !

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती सर्वत्र अतिशय उत्साहात साजरी होत असतांना पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये एका अभूतपुर्व सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

जयदेव जयदेव जय शिवराया
या या अनन्यशरणा आर्यां ताराया
आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सद्गदिता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदुनि तव हृदय न का गेला?

या काव्यपंक्ती आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या एकमेव आरतीतील ! तब्बल १२० वर्षांनंतर आज (दि. २८) ही आरती गायली गेली ती स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे फर्ग्युसन महाविद्यालयातील ज्या खोलीत वास्तव्य होते त्या खोलीसमोर !

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४०व्या जयंतीचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वास्तव्य असलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयातील खोलीमध्ये आरतीचा आज फलक लावण्यात आला. या आरतीच्या फलकाचे अनावरण झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांसह पुणेकरांनी ही आरती सामुदायिकपणे गायली.

याप्रसंगी माजी खासदार प्रदीप रावत, सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर, लेखक अक्षय जोग, लेखिका, प्राध्यापिका व संस्थेच्या मार्गदर्शिका डॉ. शुभा साठे, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी, कसबा विभाग पुणेच्या महिला आघाडी प्रमुख अश्विनी कुलकर्णी, सचिव कृष्णा वैद्य, अजित व भक्ती कुलकर्णी, विक्रम दिवाण, पुणे शहर संपर्क प्रमुख श्रीराम जोशी, विशाल कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमात सहभागी होत असंख्य पुणेकर या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार झाले. आरतीच्या फलकाचे अनावरण व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर ्‘वंदेमारतम्’, ्‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयातील कुंदनमल फिरोदिया सभागृहात लेखिका, प्राध्यापिका व संस्थेच्या मार्गदर्शिका डॉ. शुभा साठे यांचे ‘महाविद्यालयीन सावरकर’ या विषयावर व्याख्यान झाले. माजी खासदार प्रदीप रावत, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धीरज घाटे होते.

विद्यार्थीदशेतील सावरकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रवास तसेच राष्ट्रभक्त समूह-मित्रमेळा-अभिनव भारत याची वाटचाल कशा पद्धतीने झाली याचे विवेचन डॉ. शुभा साठे यांनी मार्मिक शब्दांत केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. आजच्या काळातील पिढी हुशार, बुद्धिमान, विचारी आहे; पण त्यांना राष्ट्रीय अस्मिता काय आहे याची माहिती नसल्याचे त्या म्हणाल्या. राष्ट्राविषयी सावरकर यांचे विचार काय आहेत, राष्ट्रीय अस्मिता काय आहे याची जाणिव तरुण पिढीला करून देणे काळाजी गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कृतीशिल कार्यक्रमांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार समाजासमोर नेणे आवश्यक असल्याचे प्रदीप रावत म्हणाले. रेगे या मराठी चित्रपटांमधील आरोह वेलणकर यांनी देखील या कार्यक्रमास उपस्थिती लावली.त्या तिघी ही कांदबरी संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी वेलणकर यांना भेट स्वरूपात दिली.

हेमंत सांबरे यांनी लिहिलेल्या सावरकर समजून घेताना’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या उपक्रमांची माहिती अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी दिली.विक्रम दिवाण यांची पुणे शहर अध्यक्षपदी तर विशाल कुलकर्णी यांची पुणे शहर चिटणीसपदी निवड केल्याचे त्यांनी जाहीर केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे रेखाटलेले चित्र ऋचा गोडबोले यांनी संस्थेस भेट दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती कुलकर्णी आणि निलीमा कोडोलिकर यांनी केले.

Protected Content