हे तर चोरांचं आणि खुन्यांचं सरकार” — प्रकाश आंबेडकर

 

मुंबई : वृत्तसंस्था । “हे चोरांचं आणि खुन्यांचं सरकार आहे. त्यामुळे ते बरखास्त करण्याची मागणी आम्ही राज्यपालांना करणार आहोत”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत

 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांचा लेटरबॉम्ब शनिवारी पडला आणि राज्यात गदारोळ सुरू झाला. या पत्रामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबतच महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. त्याचसंदर्भात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.  त्यामुळे परबीर सिंग यांच्या पत्रामधील दावे राजकीय घडामोडींसाठी देखील कारणीभूत ठरले आहेत.

 

आपण सोमवारी दुपारी राज्यपालांची भेट घेणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. ‘महाराष्ट्राच्या राजकारणात राजकारण आणि प्रशासनातले गुन्हेगारी घटक एकत्र येऊन काय काय करू शकतात, हे आपण पाहातो आहोत. मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी १०० कोटी कसे वसूल करायला सांगितले हे स्पष्ट केलं आहे. हा आकडा आमच्या दृष्टीने कमी आहे. पण हे नेक्सस उभं राहिलेलं आहे. २२ तारखेला सोमवारी १२.१५ वाजता राज्यपालांनी आम्हाला वेळ दिली आहे. आम्ही भेटून आमची बाजू मांडणार आहोत. तसेच, हे सरकार बरखास्त करा, अशी मागणी आम्ही करणार आहोत. हे चोरांचं आणि खुन्यांचं सरकार आहे हे दिसत आहे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

 

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या पत्रामध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना मुंबईतल्या पब आणि रेस्टॉरंटमधून महिन्याला ४० ते ५० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते.  इतर मार्गांनी देखील जमा करण्यात येणारा फंड मिळून महिन्याला १०० कोटींचं टार्गेट देण्यात आलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केला आहे.

Protected Content