मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीपेक्षा हिंमत असेल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेची निवडणूक घ्यावी असे प्रतिआव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिले आहे.
कालच्या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर नवाब मलिक यांनी आज जोरदार टीका केली. राज्यात महाआघाडीचे सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे. परंतु भाजपाला अजूनही सत्तेचे स्वप्न पडत असल्याने ते रोज ऊठसूट काहीही विधान करत सुटले आहेत. राज्यात हातून सत्ता गेल्याने भाजपचे नेते सैरभैर झाले आहेत. जर फडणवीस यांची हिंमत असेल तर त्यांनी विधानसभा नव्हे तर लोकसभेची निवडणूक घेऊन दाखवावी असे ते म्हणाले. भाजप नेत्यांना सत्तेचा आजार झाला आहे, दिवसभर सत्तेत कसा येऊ याचा विचार करतात, रात्री रोज त्यांना सत्तेची स्वप्न पडतात. यामुळे हा आजार वाढत जाणार,आम्हाला त्यांची काळजी वाटते. त्यामुळे त्यांनी चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घ्यावा असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.
भाजपाच्या काही लोकांना आमच्यात वाद आहेत असं दाखवण्याची सवय झाली आहे. बर्याच वृत्तवाहिन्या आणि पत्रकारांना आघाडी सरकारमध्ये वाद आहेत हे दाखवण्यात रस आहे, मात्र ते वास्तव नाही.आम्ही आघाडीतील सर्व मंत्री एकजुटीने काम करत असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.