जळगाव प्रतिनिधी । बांगलादेशात नवरात्रीत दुर्गा पुजामंडपावर आणि इस्कॉन मंदिरावर आक्रमण करणाऱ्या गुंडांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज सोमवारी १८ ऑक्टोबर रोजी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशात नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी धर्मांधांनी अफवा पसरवून शेकडो दुर्गापूजा मंडपावर आणि हिंदूंवर आक्रमण केले. यामध्ये बांगलादेशातील कॅमिला या भागात ९ मंडपावर आक्रमण करून तेथील देवीच्या मूर्तींची तोडफोड केली आहे. हे आक्रमण अद्यापही सुरू आहेत. त्यामुळे परिसरातील हिंदू घाबरले असून पोलिस धर्मांधांना रोखण्यात अपयशी ठरले आहेत. शिवाय शिल्पारा, कॉक्स बाजार येथील १५० हिंदु कुटुंबांवर आक्रमण केले आहे. त्यामुळे बांगलादेशात हिंदु मंदिराची तोडफोड देवतांच्या मूर्तीचे भंजन या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. बांगलादेश हिंदूंसाठी नरक बनला आहे. तेथील सरकार हिंदूंचे रक्षण करू असे सांगत असले तरी धर्मांधांना ते रोखू शकत नाही व अप्रत्यक्षपणे त्यांनाच मदत करत आहे. असा शंका निर्माण होत आहे. या संदर्भात भारत सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारत बांगलादेशातील हिंदू समाजाला सुरक्षा पुरवावी, याबाबत बांगलादेशच्या पंतप्रधानांची थेट संवाद साधावा तसेच हिंदूंवर हिंसक आक्रमणे करणार्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आज सोमवार १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर हिंदू जनजागृतीचे संपर्कप्रमुख प्रशांत जुवेकर यांच्या स्वाक्षर्या आहेत.