हा तर अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्यांचा अपमान

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिक्रिया आली आहे. भय्याजी जोशी यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा हा अपमान असल्याचं म्हटलंय.

एकीकडे संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना दिल्ली मात्र हिंसाचारानं हादरली. दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांपासून शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. मात्र या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण मिळाल्याचं पाहायला मिळालं.

‘ दिल्लीमध्ये जी हिंसा आणि उपद्रव पाहायला मिळाला. तो अत्यंत दु:खद आणि निंदनीय आहे. विशेषत: ऐतिहासिक वास्तू असलेल्या लाल किल्ल्यावर झालेलं कृत्य देशाची स्वाधिनता आणि अखंडतेच्या रक्षणासाठी बलिदान देण्याऱ्या व्यक्तींचा अपमान आहे. लोकशाहीमध्ये अशा अराजकतेला काहीही स्थान नाही’, असं ट्वीट भय्याजी जोशी यांनी केलं आहे.

 

राहुल गांधी यांनी या आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणतीही समस्या सोडण्यासाठी हिंसा हा त्याचा पर्याय असूच शकत नाही. कुणालाही मार लागला तरी आपल्या देशाचंच नुकसान होणार आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

शेतकरी नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीमारचा निषेध केला आहे. शेतकरी दिलेल्या मार्गावरून जात आहेत. संयुक्त शेतकरी मोर्चाचा एकही सदस्य आऊटर रिंग रोडला गेला नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात झालेल्या हिंसेचा निषेध करतो. सर्वांना शांत राहण्याचं आवाहन करत आहोत, असं राजेवाल यांनी सांगितलं.

ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं आणि दिल्ली हादरुन निघाली. काही आंदोलकांनी तर थेट पोलिसांवरच हल्ला चढवला. काहींनी पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. या हिसांचारात अनेक पोलिस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांचा आकडा ८३ असल्याची माहिती आहे. जखमी पोलिसांमधील ४५ जणांना ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आल्याचंही कळतंय.

‘शेतकरी आणि दिल्ली पोलिसांमध्ये झालेल्या बैठकीत ट्रॅक्टर रॅलीसाठी एक मार्ग ठरवून देण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सन्मानित करण्याची व्यवस्थाही पोलिसांनी केली होती. पण शेतकरी आंदोलकांनी हा मार्ग मानला नाही. निश्चित केलेल्या वेळेपूर्वीच ते निघाले. अनेक जागांवर त्यांनी हिंसक घटना घडवून आणल्या, त्यात दिल्ली पोलिसांचे अनेक कर्मचारी जखमी झाले आणि सरकारी मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं आहे’, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Protected Content