पुणे (वृत्तसंस्था) लॉकडाऊनच्या काळात नवरा-बायकोमध्ये हा वाद विकोपाला जावू लागले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता भांडखोर नवऱ्यांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने, तसे लेखी आदेश जारी केले आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे बहुतेक पुरुष मंडळी आपल्या घरात बसून आहे. परिणामी लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागात कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात नवरा-बायकोमध्ये भांडण झाल्यास सुरुवातीला समुदेशन करण्यात येईल. तरीही भांडण थांबले नाही तर नवऱ्याला क्वॉरन्टाईन केले जाईल, असा इशारा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून प्रत्येक गावात ग्रामस्तरीय दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत ग्रामपंचायतीमधील महिला लोकप्रतिनिधी, अगंणवाडी सेविका, महिला बचत गटातील महिलांचा समावेश आहे. नवरा बायकोची भांडणं झाल्यास या समितीमधील सदस्यांकडून आधी दोघांचे समुपदेशन केले जाईल. मात्र त्यानंतरही नवरा बायकोमधील भांडणं न थांबल्यास नवऱ्याला इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टाईन करण्यात येणार आहे.