मुंबई (वृत्तसंस्था) घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी, घरभाडे भरले नाही म्हणून किंवा घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये अशा सूचना राज्यातील घरमालकांना शासनाच्या गृहनिर्माण विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
गृहनिर्माण विभागाने दिलेल्या सूचनेत म्हटले आहे की, राज्यात भाड्याच्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय असून आर्थिक अडचणीच्या परिस्थितीमुळे भाडेकरुना ते राहत असलेल्ल्या घरांचे भाडे नियमितरित्या भरणे शक्य होत नाही व भाडे थकत आहे, ही वस्तुस्थिती आहे. कोरोनाच्या बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये घर भाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी व या कालावधीत वेळेवर भाडे रकमांची अदायगी न झाल्याने किंवा भाडे थकल्याने कोणत्याही भाडेकरुंना भाड्याच्या घरांमधून निष्कासित करण्यात येऊ नये, अशा सूचना राज्यातील सर्व घर मालकांना देण्यात येत आहे.