चार टप्प्यांमध्ये उठवला जाणार लॉकडाउन

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात दुसरी लाट ओसरली असल्याने लॉकडाउन शिथील केला जाण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले आहेत. ठाकरे सरकार टप्प्याटप्प्याने लॉकडाउन शिथील करण्याची योजना आखत असल्याचं वृत्त आहे.

“आपण तयारीचा आढावा घेणार आहोत. सर्व गोष्टी सकारात्मक असतील तरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री टास्क फोर्समधील तज्ज्ञांशी चर्चा करत निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याचा विचार करु शकतात. निर्बंध पूर्णपणे उठवले जातील या भ्रमात राहू नका,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
सरकारकडून लॉकडाउन उठवण्याची तयारी सुरु झाली असून ३० जूनपर्यंत सर्व गोष्टी पार पडतील. निर्बंध शिथील करण्यास नेमकी कधीपासून सुरुवात होईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तिसऱ्या लाटेची भीती असल्याने निर्बंध पूर्णपणे उठवले जाणार नाहीत, मात्र काही प्रमाणात शिथीलता दिली जाऊ शकते.

दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाईल. दैनंदिन गरजांशी संबंधित अन्य काही दुकानांना सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. पर्यायी दिवसांवर ही दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल, हॉटेल्स, परमिट रुम, बिअर बार, दारुच्या दुकानांना निर्बंधासह सुरु ठेवण्यास परवानगी असेल. हॉटेल्सना ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाईल. मुंबई लोकल, धार्मिक स्थळं, जिल्हाबंदी पुढे ढकलली जाऊ शकते.

ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अनलॉक करण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक गोष्टींची चाचपणी केली जाणार आहे. पण जर रुग्णसंख्या वाढू लागली आणि हव्या तितक्या प्रमाणात लसीकरण झालं नसेल तर पुन्हा लॉकडाउन लागण्याची शक्यता आहे.

लॉकडाउनसंबंधी निर्णय घेताना राज्य सरकारकडून तीन महत्वाच्या गोष्टींचा विचार केला जाईल. आगामी कॅबिनेट तसंच टास्क फोर्ससोबत होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होईल. यानंतरच निर्णय घेतला जाईल.

कोविड पॉझिटिव्हिटी रेट एका अंकावर घसरत आहे. आयसीयू ऑक्सिजनची उपलब्धता ६० टक्क्यांहून अधिक असणे. राज्यभरातील एकूण मृत्यूदर या मुद्द्यांवर विचार करून लॉकडाउनसंबंधी निर्णय घेतला जाईल –

 

Protected Content