सामान्यांची व्यवस्था करा नंतर लॉकडाउनचा विचार करा – भाजपा

 

मुंबई  : वृत्तसंस्था । “लॉकडाउन होणार या विचारानेच सामान्य माणूस हतबल आहे.सगळ्याच गोष्टींवर निर्बंध  असतील तर, माणसाने पाणी पिऊन जगायचं का?   उपाययोजनांची एवढी तारांबळ उडालेली असताना लॉकडाउनचा विचारच कसा करू शकता तुम्ही? सामान्य गरजांची व्यवस्था करा नंतर लॉकडाउनचा विचार करा ठाकरेसाहेब…”  असे भाजपचे म्हणणे आहे

 

राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज लॉकाडाउनबाबत घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला उद्देशून समाज माध्यमांवरून संबोधित करणार आहेत. या अगोदर वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाउनचा इशारा देखील दिला गेलेला आहे. शिवाय, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील राज्यात लॉकडाउनची शक्यता वर्तवलेली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री काही निर्णय जाहीर करण्या अगोदर राज्यातील प्रमुख विरोधी भाजपाने आता मुख्यमंत्र्यांवर यावरून निशाणा साधल्याचे दिसत आहे.

 

“राज्याचे अर्थचक्र आणि हातावर पोट असणाऱ्या गरिबांसाठी लॉकडाउन हा पर्याय नेहमी असू शकत नाही हे ठाकरे सरकारने लक्षात घ्यावे. त्यापेक्षा सरकारने नियम आणखी कठोर करून आरोग्य सुविधा वाढवाव्या.” अशी देखील मागणी भाजपाकडून करण्यात आलेली आहे.

 

लॉकडाउनचा निर्णय जवळपास निश्चित झाला असून, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही याला आज दुजोरा दिलेला आहे. “विषाणूची साखळी तोडण्याचा प्रयत्न करतोय. लोकांनीही हे समजून घेतलं पाहिजे. एका आठवड्यापासून सरकार प्रयत्न करतोय. पण कुठेही कमतरता दिसत नाही म्हणून मला असं वाटतंय की, राज्य सरकारचा आज यासंदर्भातील मोठा निर्णय घेणार.” असं अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.

 

Protected Content