सरनाईकांवरील कारवाई सत्तांतराचे पहिले पाऊल असू शकते !

 

मुंबई: ‘वृत्तसंस्था । शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाई हे महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन लोटस’चं पहिलं पाऊल असू शकतं,’ अशी शंका व्यक्त करतानाच, ‘कारण काहीही असो, भाजपचा मूळ उद्देश यशस्वी होणार नाही,’ असा ठाम विश्वास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. संजय राऊत यांनी ईडीला भाजपच्या १०० नेत्यांची यादी देण्याची तयारी दर्शवली आहे. तर, छगन भुजबळ यांनी हे सरकार पाडण्याचे प्रयत्न असू शकतात, अशी शंका व्यक्त केली आहे.

. ‘केंद्र सरकारच्या अखत्यारीतील यंत्रणांचा वापर कशासाठी केला जातो हे आता गुपित राहिलेलं नाही. केंद्रातील सत्ताधाऱ्यांना न आवडणारं बोललं की विरोधकांना त्रास देण्यासाठी या यंत्रणांचा वापर केला जातो. मागे आम्ही जास्त बोललो तर आम्हाला त्रास दिला गेला. पवार साहेब बोलले तर त्यांना ईडीची नोटीस पाठवली गेली. कंगना राणावत सारख्या काही प्रकरणांत प्रताप सरनाईक आपल्या पक्षाच्या बाजूनं बोलत होते. त्यामुळं त्यांच्या विरोधातही असं काही होईल असं वाटतंच होतं. तसं ते होतंय. विरोधकांची तोंडं दाबण्यासाठी हे सगळं केलं जातंय,’ असं भुजबळ म्हणाले.

‘ऑपरेशन लोटसचं हे पहिलं पाऊल असू शकतं. मी नाकारणार नाही. पण ते यशस्वी होणार नाही. अशा दबावामुळं काही घडेल असं वाटत नाही. पण केंद्रातील सत्ताधारी प्रयत्न करतच राहणार,’ असंही भुजबळ म्हणाले. ‘राजकीय हेतूनं काही करायचं ठरवलं की ते काहीही करतात. त्याला काही धरबंद नाही. जणू नियमावलीच ठरून गेलीय. मध्य प्रदेश, राजस्थान सगळीकडं होतंय. महाराष्ट्रातही प्रयत्न होणार. पण त्यांचा मूळ उद्देश यशस्वी होणार नाही,’ असं भुजबळ ठामपणे म्हणाले.

सरनाईकांवरील कारवाईबाबत बोलताना, कायद्याला कायद्याचं काम करू द्या, असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनाही भुजबळ यांनी टोला हाणला. ‘कायद्याला त्याचं काम करू द्या हे बोलणं सोपं आहे. पण त्यामुळं एखाद्या व्यक्तीचं प्रचंड नुकसान होतं. अनेकदा कारण नसताना वर्षानुवर्षे एखाद्या माणसामागे कायद्याचा ससेमिरा लागतो. त्यामुळं ते बोलणं सोपं आहे. वास्तव वेगळं असतं,’ असं भुजबळ म्हणाले.

Protected Content