संजय राठोड यांच्या भाषणाची उत्सुकता

 

अकोला : वृत्तसंस्था । वनमंत्री संजय राठोड कुटुंबीयांसह पोहरादेवीसाठी रवाना झाले असून तिथे गेल्यानंतर ते बंजारा समाजाला उद्धेशून भाषण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इतके दिवस मौन बाळगणारे संजय राठोड आपली बाजू मांडताना नेमकं काय बोलणार याची उत्सुकता आहे.

 

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड अखेर १५ दिवसांनी समोर आले आहेत. पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आल्यापासूनच संजय राठोड अज्ञातवासात गेले होते. एका ऑडिओ क्लिपमुळे संजय राठोड यांचं नाव चर्चेत आलं होतं. यानंतर भाजपाने जाहीरपणे संजय राठोड यांच्याविरोधात कारवाईची मागणी सुरु केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच संजय राठोड सर्वांसमोर आले असून पोहरादेवीसाठी रवाना झाले आहेत.

 

संजय राठोड येणार असल्यानेच पोहरादेवीत सकाळपासूनच जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. संजय राठोड समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

 

मुळची परळीची असणाऱ्या पूजा चव्हाणे पुण्यात ७ फेब्रुवारीला मध्यरात्री आत्महत्या केली. पूजा चव्हाण शिक्षणासाठी आपल्या भावासोबत पुण्यातल्या हडपसर भागात राहत होती. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आसपास तिनं महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच या तरुणीनं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जाऊ लागलं.

 

या घटनेमागे महाआघाडी सरकारमधील एक मंत्री असल्याची चर्चा सुरू असताना आता त्या तरुणीच्या जवळील एका व्यक्तीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यामध्ये ती व्यक्ती साहेब ती आत्महत्या करणार आहे. तिला समजून सांगा असं सांगत असल्याचं ऐकू येत आहे. पण ती व्यक्ती नेमकी कोणासोबत बोलत आहे हे उघड झालेलं नाही.

 

एकीकडे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कुणाचं नाव न घेता चौकशीची मागणी करणारं पत्र पोलीस महासंचालकांना दिलं असताना   संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी थेट मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात समाजमाध्यमांमध्ये ध्वनिफितीसुद्धा फिरत आहेत. त्यामुळे बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थता असून सखोल चौकशी करावी,” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे पत्र पाठवून केली होती.

 

पोलिसांनी स्वत: (स्यु-मोटोतंर्गत) तक्रार दाखल करत संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,” असे चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Protected Content