संजय राऊत यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांवर टीका

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । महाराष्ट्र सरकार अपयश लपवत नाही. या बाबतीत राजेश टोपेच जास्त सांगू शकतील. पण महाराष्ट्राला कमी लेखण्याचा, संकटात आणण्याचा, बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आम्हाला हर्षवर्धन यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती , अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे .

 

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात तीन दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती दिली आहे. केंद्राकडून गरज आहे तितक्या वेगाने लसींचा पुरवठा होत नसल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधत कोरोना आटोक्यात आणण्यात आलेल्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी काही राज्ये लशीचा तुटवडा असल्याची नाहक भीती निर्माण करत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

 

“महाराष्ट्र सरकार काय करत आहे याची दखल जागतिक आरोग्य संघटनादेखील घेत आहे. गुजरात हायकोर्टानेही दखल घेतली आहे. महाराष्ट्र एक मोठं राज्या असून सर्वात जास्त दबाव आहे. आर्थिक, लस, वाढती रुग्णसंख्या अशा अनेक गोष्टींचा दबाव आहे. केंद्र आणि राज्याने एकमेकांवर टीका-टिप्पणी न करता जनतेची सेवा केली पाहिजे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

लशींचा तुटवडा असल्यासंदर्भात महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींकडून केली गेलेली विधाने म्हणजे कोरोना आटोक्यात आणण्यामध्ये राज्य सरकारला आलेल्या अपयशापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. राज्यात कोरोना  रोखण्यात राज्य सरकार अपयशी  ठरले आहे. त्यात लससाठ्यावरून लोकांमध्ये घबराट निर्माण करणे म्हणजे समस्येत आणखी भर घालण्यासारखे आहे, अशा शब्दांत हर्षवर्धन यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. कोणत्या राज्याला किती लशींचा पुरवठा होत आहे, याची अद्ययावत माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालय घेत असते. राज्य सरकारच्या लशींच्या गरजेचा सातत्याने आढावा घेतला जात असतो. त्यामुळे लशींचा तुटवडा असल्याचा महाराष्ट्राचा दावा बिनबुडाचा असल्याचेही हर्षवर्धन यांनी निवेदनात म्हटलं आहे.

 

‘वैयक्तिक वसुली’साठी बाधित व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणातून बाहेर पडण्याची मुभा दिली जाते. नियम मोडून राज्य सरकार अख्ख्या महाराष्ट्राला संकटाच्या खाईत लोटत आहे. महाराष्ट्र एकामागून एक संकटाचा सामना करत असताना राज्य नेतृत्वाने मात्र डोळे मिटून घेतले आहेत, असा टीकेचा भडिमार हर्षवर्धन यांनी केला.

Protected Content