संजय राऊत यांचा सर्वच मंत्र्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवं. सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे

सचिन वाझे प्रकरणात महाविकास आघाडी सरकारसमोरील अडचणी वाढल्याचं दिसत आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवलं. या पत्रात थेट गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. या पत्राची खातरजमा केली जात असली, तरी सरकारसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सरकारमधील सर्व घटकांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.

 

राऊत म्हणाले, “सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्य सरकारवर शिंतोड उडाले आहेत. . पोलीस खाते हे राज्याचा कणा असतो. स्वाभिमानाचे प्रतिक असते. हा कणा राज्यकर्त्यांनी मजबूत ठेवायचा असतो. सध्याची परिस्थिती पाहता काहीतरी दुरुस्त करावं लागेल” .

 

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायम सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गोष्टी घडल्या. या सगळ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. जगभरात सत्तास्थानी बसल्यावर अनेकांना आपण शहाणं असल्याचं वाटायला लागतं, हे या प्रकरणाच्या निमित्ताने दिसून आलं.  शरद पवार योग्य भूमिका आणि निर्णय घेतील. मी आज दिल्लीत जाणार आहे. त्यावेळी शरद पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन,” असं राऊत यांनी सांगितले.

 

“परमबीर सिंह हे माजी पोलीस आयुक्त  उत्तम अधिकारी आहेत. परमबीर सिंह यांनी पत्रात लिहलेल्या गोष्टींची सत्यता पडताळावी, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. मुख्यमंत्री ही सत्यता पडताळून पाहतील. विरोधी पक्षाच्या मागणीवर सरकार चालत नाही किंवा सरकारमध्ये उलथापालथ होत नाही. मी चहाला उधार नाही, पण या पत्राने सरकारवर शिंतोडे उडवले ही बाब मी मान्य करतो. हे सरकार स्थापन करण्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या पण सरकारबाहेर असणाऱ्या माझ्यासारख्या हितचिंतकांसाठी ही धक्कादायक गोष्ट आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Protected Content