शेत शिवारातील विज पुरवठा खंडीत केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडणार 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यासह परिसरात नुकतेच रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली असतांनाच महावितरण कंपनीने शहानिशा न करता शेत शिवारातील सरसकट विज पुरवठा खंडीत करण्याचा तडाखा सुरु केला आहे.

यामुळे शेतकऱ्यांमधुन महावितरण विरोधात कमालीची नाराजी व्यक्त केली जात असल्याने महावितरण कंपनीने येत्या आठवडे भरात शेत शिवारातील विज रोहित्रांवरुन विज पुरवठा खंडीत करण्याचे न थांबविल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडणार असल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील यांनी आज २५ नोव्हेंबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील “शिवतीर्थ” या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, मा. नगरसेवक दत्ता जडे, शहरप्रमुख अनिल सावंत, युवासेना उपजिल्हाप्रमुख संदिप जैन, राजेंद्र राणा, संजय चौधरी, सैय्यद गफ्फार, मिथुन वाघ, नाना वाघ उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासुन आपण पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे विजबील थकले आहे. या कारणाखाली शेत शिवारात उभ्या असलेल्या आपल्या विज रोहीत्रांचे वीज कनेक्शन सरसकट बंद करीत आहात त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. नुकताच रब्बीचा हंगाम सुरु केला असुन शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीन, तुर, हरबरा, मका, सुर्यफुल, ज्वारी, दादर, बाजरी व गहु या अन्नधान्य पिकाची मोठ्याप्रमाणात पेरणी केलेली आहे. असे असतांना ऐन पिकांना पाणी देण्याच्या कालावधीत आपण सरसकट शेतकऱ्यांची वीज ज्या रोहीत्रावरुन येते ते रोहीत्रच बंद करुन शेतकऱ्यांचे अन्नधान्य पिकाचे नुकसान करीत आहात.

त्यामुळे सदर अन्नधान्य पिकाच्या उत्पन्नावर मोठा विपरीत परीणाम होवुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

नुकतेच राज्य अन्न आयोग महाराष्ट्र राज्य यांनी कामकाज तक्रार क्रं. २, ३, ४ / २०२२ या तीन तक्रारींची सुनावणी घेवुन त्यांचा निकाल जाहीर केला आहे. ज्याज आपली कंपनी देखील प्रतिवादी होती. त्याची प्रत सोबत जोडली आहे. त्यांचे निकालाची प्रत त्यांचे क्र. रा.अ.आ. – २०२२/सुनावणी / प्र. क्र. ४८ / १९०. दि. २१/१०/२२ या पत्रासोबत आहे. त्यात त्यांनी आपल्या कंपनीला स्पष्ट शब्दात सुचीत केले आहे की, शेतकऱ्यांची वीज न तोडता अन्य इतर कायदेशीर तरतुदींचा अवलंब करावा. राज्य अन्न आयोग महाराष्ट्र राज्य यांनी स्पष्टपणे कळवुन देखील आपण त्यांचे आदेशाचा अवमान करीत विज कनेक्शन तोडत आहात. आपले हे बेकायदेशीर कृत्य तातडीने थांबवावे व शेतकऱ्यांकडुन इतर कायदेशीर मार्गाने वीजबील वसुलीची कारवाई करावी.

आपण वीज कनेक्श्न तोडणी न थांबविल्यास शिवसेना पुढील महीन्याचे पहील्या सप्ताहापासुन आपल्या विरोधात शिवसेना स्टाईलने तिव्र आंदोलन उभे करेल. त्याचे होणाऱ्या परिणामांना तुम्ही व तुमची कंपनी जबाबदार राहील. अशा आषयाचे लेखी पत्र देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने पाचोरा येथील महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

Protected Content