शेतकरी आंदोलनाला चीन, पाकिस्तानातून पैसा !

 

 

पुणे : वृत्तसंस्था । दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला चीन आणि पाकिस्तानमधून फंडिंग होते की काय, असे वाटत आहे’, असे वादग्रस्त विधान पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर व भाजपचे स्थानिक नेते केशव घोळवे यांनी केले आहे.

केशव घोळवे हे शेतकरी आंदोलनाचा संबंध पाकिस्तान आणि चीनशी जोडून थांबले नाहीत. त्यांनी आणखीही वादग्रस्त विधान केले. या आंदोलनाला रोजंदारीने लोकं आणली जात आहेत, अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतच त्यांनी ही विधानं केल्याने एकच खळबळ उडाली. त्यांच्या या विधानावर महापालिकेतील विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतलीच शिवाय भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनीही उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदी भाजपचे केशव घोळवे यांची एक महिन्यापूर्वीच निवड झाली आहे. तुषार हिंगे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या जागी घोळवे यांची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे केंद्रातील मोदी सरकारच्या कामगार कायद्यांविरोधात विविध संघटनांनी २६ नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपावेळी आंदोलनात उतरून केशव घोळवे यांनी सर्वांनाच धक्का दिला होता. केंद्राच्या कायद्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप असल्याचे सांगत या कायद्यांत तातडीने दुरुस्ती व्हायला हवी, अशी मागणी करून घोळवे यांनी आपल्याच सरकारविरुद्ध भूमिका घेतली होती. तेच घोळवे आता शेतकरी आंदोलनाचा चीन आणि पाकिस्तानशी संबंध जोडून नव्या वादात सापडले आहेत.

केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांविरुद्ध शेतकरी संघटनांनी आज भारत बंद पाळला आहे. या बंदला काँग्रेससह देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. एकीकडे शेतकरी आंदोलन तीव्र होत असताना दुसरीकडे भाजपचे अनेक नेते व मंत्री या आंदोलनावर टीका करताना दिसत आहेत.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी तर आंदोलन करणारे शेतकरी आपल्याला खरे शेतकरी वाटत नसल्याचे विधान केले होते. देशातील शेतकऱ्यांचा नव्या कृषी कायद्यांना पाठिंबा आहे मात्र, काही राज्यांमधील काँग्रेसची सरकारं आणि विरोधी पक्ष शेतकऱ्यांना चिथावणी देत आहेत. आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत, असा आरोप चौधरी यांनी केला होता. तसाच सूर भाजपच्या आणखीही काही नेत्यांनी लावला असून त्यात आता केशव घोळवे यांच्या विधानाची भर पडली आहे.

Protected Content