शब्ब-ए-बारात आणि हनुमान जयंतीला कोणीही घराबाहेर पडू नका – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई वृत्तसंस्था । शब्ब-ए-बारात आणि हनुमान जयंतीला कोणीही घराबाहेर पडू नका असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे. कोरोना संसर्गाची साखळी आणि नागरीकांचा जीव वाचविणे हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक नागरीकाचे एकमेव कर्तव्य आहे. त्यासाठी कोणीही घराबाहेर न पडणे, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणे हे प्रत्येकाची जाबाबदारी आहे. असे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवाहन केले आहे.

पुढील सूचना येईपर्यंत सण, उत्सव, पूजा, अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही घरातंच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये, असं अजित पवार यांनी सांगितले आहे. करोनाच्या रुग्णसंख्येत दररोज शेकड्यांनी वाढ होत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. नागरिकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवले पाहिजे. शासनाने राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. बंदी आदेश जारी केले आहेत. आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकलं जाईल. करोनाच्यासंदर्भात शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही. करोना प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होतील आणि त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही अजित पवारांनी दिला आहे.

अजित पवार यांनी जागतिक आरोग्यदिनाच्या निमित्ताने राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. संपूर्ण जग करोनाच्या संकटाचा मुकाबला करत असताना जागतिक आरोग्याचं आणि आरोग्य संघटनेचं महत्वं पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं त्यांनी आपल्या संदेशात सांगितले आहे.

Protected Content