विहिरीत पाय घसरून पडल्याने महिलेचा बुडून मृत्यू

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील मोहाडी शिवारात पाणी घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २४ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सरला योगेश राजपूत (वय-३०, रा. मोहाडी ता. जामनेर जि. जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील मोहाडी येथे सरला राजपूत या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. शेतातील काम करून आपला ते उदरनिर्वाह करीत होत्या. मंगळवारी २४ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता त्यांच्या शेतात तूर काढण्याचे काम सुरू होते. दरम्यान शेतात काम करणाऱ्या महिला कामगारांना पाणी घेण्यासाठी त्या विहिरीजवळ गेल्या होत्या. पाणी काढत असतांना त्यांचा पाय घसरल्याने त्या विहिरीत पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. उशिरापर्यंत महिला पाणी घेऊन आल्या नाही म्हणून महिला कामगार विहिरीत जवळ आले असता डोकावून पाहिले तर सरला राजपूत या पाण्यात बुडून मयत झालेल्या होत्या. महिलांनी आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. जामनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली चांदा यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन पाटील करीत आहे.

Protected Content