विदर्भात चार दिवसांत एकही मृत्यू नाही; रुग्णसंख्याही खालावली

 

नागपूर : वृत्तसंस्था । विदर्भात चार दिवसांत एकही मृत्यूची नोंद नसून ६ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. विदर्भात गेल्या २४ तासांत १४ हजार चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ३४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले .

 

विदर्भाचा पॉझिटीव्हीटी रेट ०.३० टक्क्यांवर गेला असून रिकव्हरी रेट ९८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

 

राज्यात सध्या सर्वाधिक ७० टक्के बाधित पश्चिम महाराष्ट्रात आढळत आहेत. १५ जिल्ह्यांमध्ये १० पेक्षा कमी रुग्णांची नोंद आहे. भंडारा, वर्धा, गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नसून यवतमाळ, अकोला, नागपूर, चंद्रपूरमध्ये दहापेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. फक्त अमरावतीत १० बाधितांची नोंद करण्यात आली.

 

विदर्भातील काही जिल्ह्यांसह धुळे आणि नंदुरबार हे जिल्हेही लवकरच कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. नियमांचे पालन करून आठवडी बाजार भरवण्यात येत आहेत.

 

राज्यात १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केलाय. राज्यात रुग्णसंख्येत चढउतार सुरूच आहे. त्यामुळे जोपर्यंत मुलांचं लसीकरण होत नाही तोपर्यंत शाळा सुरू केल्या जाऊ नयेत, असं आयएमएचे प्रवक्ते अविनाश भोंडवे यांनी म्हटलंय.

सध्या राज्यातील १२ हजार ७२५ शाळा सुरू करण्यात आल्या असून तेथे साधारण साडेदहा टक्के  उपस्थिती आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, रायगड, रत्नागिरी, सातारा, नगर, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्य़ांमध्ये शाळा सुरू झाल्या नाहीत.

 

Protected Content