जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंदे बंद करण्याबाबत राष्ट्रीय दलित पॅंथरचे महानगराध्यक्ष शांताराम अहिरे यांनी आज बुधवारी 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन, शनी पेठ पोलीस स्टेशन, जळगाव शहर पोलीस स्टेशन, जळगाव तालुका पोलीस स्टेशन, जिल्हा पेठ पोलीस स्टेशन आणि रामानंदनगर पोलिस स्टेशन या परिसरात अवैध धंद्यांमुळे गरीबांचे घरसंसार उध्वस्त होत आहे. सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी १२ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. परंतू अवैध धंदे सुरू असून दिलेल्या निवेदनावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज बुधवार २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय दलित पँथरचे महानगराध्यक्ष शांताराम अहिरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.