राज्यात कोरोना नियमांमध्ये कोणतीही सूट नाही — राजेश टोपे

 

मुंबई : वृत्तसंस्था । कोरोनाचा धोका पाहता राज्यात कोरोना रोखण्यासाठीच्या नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं

 

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र असं असताना तिसऱ्या लाटेचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशननं दिला आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णवाढीचा दर कमी आहे.

 

आरोग्यमंत्री टोपे यांनी अशी भूमिका घातल्यामुळे  व्यापारी आणि प्रवाशांच्या पदरी निराशा पडली आहे. दुकानं आणि प्रवासाच्या नियमात कोणतेही बदल नसतील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्यावर आमचा भर असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. उर्वरित २६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नगरमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे.

 

केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त लसी मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील असल्याचं राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. ऑगस्ट महिन्यात ४ कोटी लसी उपलब्ध होतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. सध्या राज्यात होणारा लसींचा पुरवठा हा कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसरीकडे लसीचे दोन डोस घेतलेल्यांना आरटीपीसीआर विना राज्यात प्रवेश देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

 

कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सेवानिवृत्तीचं वय ६२ पर्यंत वाढवण्यात आलं आहे. सेवा निवृत्तीचं वय वाढवण्यास कार्योत्तर मान्यता मंत्रिमंडळानं दिली आहे. त्याचबरोबर डॉक्टरांची रिक्त जागा भरण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

राज्य सरकारने मंगळवारी दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ७ हजार २४३ नवे बाधित आढळले आहेत. हा आकडा सोमवारी ७ हजार ६०३ इतका होता. त्यामुळे नव्याने आढळणाऱ्या बाधितांची संख्या कमी होऊ लागल्याचं दिसून येत आहे. नव्या बाधितांच्या आकडेवारीनंतर महाराष्ट्रात आजपर्यंत सापडलेल्या एकूण बाधितांची संख्या आता ६१ लाख ६५ हजार ४०२ इतकी झाली आहे.

 

Protected Content