राज्यात ओबीसीचे आंदोलन तीव्र होणार

 

जालना: वृत्तसंस्था । ओबीसी समुदायांची स्वतंत्र जनगणना व्हावी, या मागणीसाठी रविवारी जालन्यात महामोर्चा काढण्यात आला होता. त्यात प्रमुख ओबीसी नेते सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांनी ‘आता मुख्यमंत्री ओबीसीचाच’ असे बॅनर्स झळकावत आगामी काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला.

या मोर्चाला सुरुवातीला पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, नंतर मोर्चा काढण्यास सशर्त परवानगी देण्यात आली. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार जालन्यात आले आहेत. त्यांच्या हस्तक्षेपामुळेच पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर सगळा ओबीसी समाज एकत्र आहे, असा इशारा यावेळी विजय वडेट्टीवार यांनी दिला.

हा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही. हा मोर्चा आमच्या हक्कासाठी काढला आहे, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार केले. तुम्ही निवेदन दिलं मी हे प्रश्न सातत्याने मांडत आहे. मी पक्ष धर्म जात पात सोडून फक्त ओबीसी म्हणून लढत आहे. ही प्रेरणा गोपीनाथ मुंढे यांच्याकडून मिळाली ते आज हयात नाहीत, त्यांनी केलेल्या संघर्षाला सलाम केलं पाहिजे, भुजबळ यांनीही धुरा हाती घेतली ते ही लढत राहिले हे ओबीसींच्या हक्कसाठी लढणारे नेते आहेत, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

ओबीसीची स्वतंत्र जनगणना होत नसेल तर मुख्यमंत्री आणि मोदी साहेब यांना विनंती करू. विधानसभेत स्वतंत्र जनगननेचा प्रस्ताव मी मांडणार आहे. पक्षाच्या पलीकडे लढाई जात नाही तोपर्यंत यश मिळणार नाही, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.

Protected Content