राज्यातील ८५ टक्के जनतेचं काय? : प्रकाश आंबेडकरांचा सवाल

 

मुंबई वृत्तसंस्था । एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय हा राज्यातील एका जातीसाठी घेण्यात आला असून उर्वरित ८५ टक्के जनतेचे काय ? असा प्रश्‍न आज प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर मराठा संघटनांनी मागणी केल्यामुळे राज्य सरकारनं एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. एमपीएससी परीक्षांवर तोडगा काढता आला असता. मात्र ही परीक्षा रद्द करताना सरकारनं एकाच जातीचा विचार केला आहे. उर्वरित ८५ टक्के जनतेचं काय? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

आंबेडकर पुढे म्हणाले की, मला जे बोलायचे ते मी बोलतो. एका जातीचं राजकारण चालणार नाही. कोणत्या प्रश्‍नांवर बोलायचे हे आम्ही ठरवितो. त्यामुळे टीका करणार्‍यांनी आपलं चारित्र बघावं आणि नंतर टीका करावी, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. मराठा आंदोलनकर्त्यांना सरकारनं विश्‍वास दिला नाही. महाविकास आघाडीचं सरकार अतिरेक करत आहे. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या दिशानिर्देशाची अंमलबजावणी करत नाही. वारकरी संप्रदायाने सरकारच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे महाराष्ट्रमध्ये मंदिरे उघडी केली जात नाही. सरकार वारकर्‍यांना धडा शिकवण्याच्या तयारीत आहे असं दिसतं आहे, असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला.

Protected Content